शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१८

सोपी वाट जगण्याची

सोपी वाट जगण्याची

दूरवर क्षितिजाला स्पर्श करणारा तांबूस गोल अगदी सावकाश, अलगदपणे मार्ग आक्रमीत होता आणि समांतर उडणारे समुद्र पक्षी एका अदृष्य गंतव्याकडे झेपावत असताना... शरीराला हळूवार स्पर्शातून जाणवणारा किनाऱ्यावरचा मंद वारा, एका वेगळ्याच विश्वात तन मनाला समाधिस्थ करीत होता आणि विसर पाडीत होता आजूबाजूच्या सर्व व्यवहारीक जिवंतपणाचा. समुद्राच्या मंद, खळखळाट करणाऱ्या शितल लाटा शिवाशिवीचा खेळ खेळत किनाऱ्याची भेट घेऊन परत जातांना मन सुद्धा नकळत त्यांच्या सोबत हेलकावे खायला लागतं, तेव्हा लाटांची अशी आवर्तनं का कुणास ठावूक मनाला जवळची, आपलीशी वाटू लागतात.

एरवी उर्जेचा, जगण्याचा आणि उत्साहाचा असीम स्त्रोत घेऊन उजाडणारा असाच अल्हाददायक, केशरगर्भ दिवाकर तप्त दुपारशी कधी आणि कशी जवळीक साधतो आणि नंतर सावकाश, अलवारपणे संध्याकाळशी हितगूज करू लागतो ते उमजतच नाही, हे सारं कळतं केवळ हातातील किंवा भिंतीवरील घड्याळाच्या पुढे पुढे सरकणाऱ्या काट्यांमुळे, ए.सी. ने थंड झालेल्या काचेच्या बंद गगनचुंबी इमारतीच्या वातावरणातील आतल्या जगाला बाहेरचं जग सहसा मोकळ्या आणि महत्त्वाचं म्हणजे उघड्या डोळ्यांनी सहजपणे पहायला अनुभवायला आणि डोळ्यात साठवायला वेळ नसतो, नेमकं असं आयुष्य हल्ली संपुर्ण जगात बहुतेक लोक जगताहेत असं वाटतं.

आधुनिक प्रगत साधनांमुळे खरंच आपण विकसित की मेकॅनिकल झालोय? की रोज होणाऱ्या शोध आणि संशोधनांना युज टू झालोय? नाही लक्षात येत ना? बरोबर आहे कारण आधुनिक साधनांचा एवढा प्रचंड पगडा आपल्या रोजच्या जीवनावर पडला आहे की त्यामुळे आपली विचारशक्ती सुद्धा सीमित होऊ लागली आहे. जरा विचार करा अगदी सकाळी उठण्यासाठी सुद्धा आपण अलार्म सारख्या यंत्रावर किंवा एखाद्या मशीनवर अवलंबून रहातो... काही सन्माननिय अपवाद असतीलही, त्यानंतर संपूर्ण दिवसाभराची तशीच अवस्था होऊन जाते. नैमित्तिक प्रवास, कार्यालय सर्व ठिकाणी संगणका पासून नोटा, चिल्लर मोजणे ते चहा कॉफी, पोळ्या बनविण्या पर्यंतची अनेक यंत्रे काळाची गरज म्हणून आली? आणि आपण ती सर्रासपणे वापरतोय. अर्थात मला त्या यंत्राच्या निर्मिती मागच्या मेहनतीची, कल्पनाशक्तीची किंमत आणि त्याबद्दल कौतुक आणि आदर नक्कीच आहे. 

कधी विचारतो का आपण आपल्या मनाला प्रश्न "की आपण आपलं जगणं सोप केलय की परावलंबी?" मला ते सहज परावलंबी झालेलं जाणवतं, कारण हल्ली साध्या साध्या गोष्टींसाठी आपण मशीन, यंत्रावर निर्भर राहू लागलो, साधं गणित करायचं म्हटलं तर आम्हाला कँलक्युलेटर हवा, त्यामुळे मेंदूची क्षमता कमी होऊ लागली. बारकाईने निरीक्षण केल्यास अशा अगणित छोट्या छोट्या गोष्टी समोर येतील आणि लक्षात येईल की अरे, ही कामं आपण या अगोदर स्वत:च तर करीत होतो... सोप्पी तर आहेत.

विषय जरा भरकटला वाटतं? तर मंडळी तसंं नाही, विषय तोच आहे म्हणजे आपण निसर्गाने बहाल केलेल्या उपजत गोष्टींपासून दूर होऊ लागलोय. सुरवातीला म्हटल्याप्रमाणे एकदा का आम्ही इमारतीत शिरलो की आम्हाला दिवसभर सुर्यदर्शन होत नाही, मग सकाळचा रम्य  सुर्योदय कसा कळणार? मोकळी शुद्ध हवा नाही, समुद्राच्या खारट वाऱ्याची चव नाही, वृक्षवेलींचा स्पर्श नाही, स्पर्श होतो तो केवळ घरातल्या कोपऱ्यातील आणि तसबिरींवर असलेल्या प्लास्टिकच्या फुलांचा. तसंच कुणाशी मोकळा संवाद नाही, प्राण्यांशी खेळणं, दंगामस्ती करणं नाही. मान्य हे सारं खेड्यात आहे, पण हल्ली आधुनिकीकरणाच्या नावाने खेडी सुद्धा कात टाकू लागलीत. 

आधुनिकीकरण, शहरीकरण वाईट नाही, त्याच्या आहारी जाऊन त्या सोई सुविधांचा अतीवापर वाईट आहे. गरजेनुसार त्या त्या सुविधा वापरून अलिप्त राहता यायला हवं. बऱ्याचदा ते जमत नाही म्हणून सुट्टी घेऊन पर्यटन केले जाते, ते सुद्धा स्पर्धेतून किंवा चढाओढीतुन होताना दिसते, काहीही असो त्या निमित्ताने माणूस निसर्गाच्या जवळ जातोय हेही नसे थोडके. 

पंचमहाभूतांनी निर्माण केलेल्या या शरीराला आणि निसर्गाला एकरूप होउ द्या, ईतकी वर्षे तोच आपलं अनेक स्वरूपात भरण पोषण करतोय, त्याला नाकारून कसे चालेल? आपण त्याला नाकारून किंवा त्यावर कुरघोडी करू लागलो तर तो त्याचे रौद्र रूप दाखवतो जे मानवी क्षमते पलीकडे आहे याचं भान ठेवायला हवं. आजच एका कार्यक्रमात अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले की "लहानपणी गावी एक देऊळ बांधताना शेजारी वेगवेगळ्या प्रकारची पाच सहा झाडं लावली होती. खुप वर्षानी तिथे पाहिलं तर लक्षात आलं की ती झाडं मोठी झालीत, त्यांना फुलं फळ येतात, त्यावर अनेक पक्षी येतात, गुरं ढोरं, वाटसरू त्यांच्या सावलीला थांबतात, हा झाला त्यांच्यातला बदल, पण देऊळ तसचं आहे. माझ्या मते निसर्गच खरा देव आहे?" कीती स्पष्ट विचार आहेत नाही? तर मंडळी निसर्ग आपला आहे आणि आपण त्याचे, तर म्हणूयात...

"जोपासना करूया निसर्गाची, 
होईल सोपी वाट जगण्याची".

©शिवाजी सांगळे, मो.+९१ ९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t31408/new/#new

बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१८

कथा


५१६/२८११२०१८ 

व्रतस्थ जीवन



ताबा


२६०/२७११२०१८

वादळ मनातलं




गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१८

शोध आणि बोध

शोध आणि बोध

आपण सगळे तिर्थाटन करतो, यात्रा करतो त्या दरम्यान मंदिरात जातो, का बरं जातो आपण? कारण परंपरेने काही धार्मिक गोष्टी आपल्याला वारश्यात प्राप्त झालेल्या आहेत, कधी त्याचे पालन करायचे म्हणून तर कधी श्रद्धा म्हणून, पण त्या त्या ठिकाणी खरोखरच परमेश्वर आपल्याला दिसतो, भेटतो का? यावर माझ्यामते उत्तर नाही असेच आहे... कारण परमेश्वर हा तुमच्या आमच्या ह्रदयात वसलेला आहे, अशाच काहीशा भावना गीतकार वंदना विटणकर यांनी आपल्या गीतातून व्यक्त केल्या आहेत... “शोधिशी मानवा, राऊळी मंदिरी, नांदतो देव हा, आपुल्या अंतरी”

परमेश्वर हा आपल्या प्रेमळ स्नेहमयी आचरणातुन, व्यवहारातुन, परोपकारातून तुम्हाला आणि इतरांना दिसतो, जाणवतो... पंचमहाभुतांच्या प्रेरणेतून आपण जीवंत असल्या कारणाने मी स्वतः परमेश्वराला पुढील प्रमाणे  शोधायचा प्रयत्न करतो... योग्य अयोग्य काय हे नाही समजत तरीही...या भावना चुकीच्या नाहीत असं म्हणावे लागेल.

दया क्षमा भाव । मना चित्ती धरी । वसे जो अंतरी । रत्नगर्भे  ।।१।।
जगता असावा । निर्मळ स्वभाव । पारदर्शी भाव । जळा परी ।।२।।
प्रयत्ने रहावे । उध्दाराया तमा । येवो जन्म कामा । कवि जैसा ।।३।।
अदृष्य रूपात । तारतो सर्वांस । अहर्निश श्वास । देतो प्राण ।।४।। 
ह्रदयी जपावी । वात्सल्य करूणा । जसा नेत्री पान्हा । गो मातेच्या ।।५।।
वृक्षाचीये ठायी । जैसा सेवा धर्म । आचरावे कर्म । सर्वां प्रती ।।६।।

कुणी मानो अथवा न मानो परंतु निराकार, निर्गुण अशा सर्वव्यापक परमेश्वराचं अस्तित्व आपल्याला शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध अशा पाच कर्मेंद्रियां द्वारे जाणवत असतं आणि विशेष म्हणजे महत्त्वाचं सहावं ईंद्रीय जे मन आहे असे आपण मानतो ते या सर्वांना कबूल करून मान्यता देते किंबहुना पुढील श्लोकात म्हटल्या प्रमाणे ...

"ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः।
मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति।"  (श्रीमद् भगवद्गीता १५:०७)

परमेश्वराचे अस्तित्व या सर्व ईंद्रीयांना स्वतः पर्यायाने प्रकृतीकडे आकर्षित करून घेत असते. मग अस्तिक नास्तिकतेचा प्रश्नच उद्भवत नाही कारण अणु रेणूने बनलेल्या शरीरात जोवर श्वास अर्थात जीव आहे, तोवर या सर्व गोष्टी तुमच्या आमच्या पासून वेगळ्या होऊच शकत नाहीत या न त्या प्रकारे प्रकृतिशी, निसर्गाशी मर्त्य जीवाला जुळवून घ्यावेच लागणार, भले कुणी मान्य करा अथवा न करो. इथे प्रश्न भावणाऱ्या, आकलन होणाऱ्या जाणीवांचा आहे, आणि नेहमी आपण म्हणतोच की त्याच्या इच्छे विरुद्ध झाडाचे पान सुद्धा हलत नाही, सर्व कर्ताकरविता तोच आहे.

आजवर अनेक संत महंतानी परमेश्वराला अनेक रुपात शोधायचा प्रयत्न केला, कुणाला तो मळ्यात, मातीत जाणवला, कुणाला साक्षात्कार झाला संतशिरोमणी श्री तुकाराम महाराज आपल्या अभंगातून त्या परमेश्वराला निसर्गात केवळ शोधतच नाहीत तर त्याला आपला नातलग, सगा सोयरा मानतानां म्हणतात... 'वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें'... थोडक्यात काय तर प्रत्येक संतांनी आप आपले व्यवसाय करताना त्या परमेश्वराची सेवा करीत आहे असे समजून त्याचा शोध घेत राहिले आणि त्यातून आध्यात्मिक साहित्याचा अनमोल असा अपार ठेवा आपल्याला मिळाला. आधुनिक काळातील कवींनी पण अनेक पद्धतीने त्याला शोधायचा प्रयत्न केला आहे त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे गीतकार सूर्यकांत खांडेकरांना पडलेला प्रश्न, ते विचारतात...

"त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का? त्या प्रकाशी तारकांच्या ओतिसी तू तेज का?"

कीती साधा परंतु अंतर्मुख व्हायला लावणारा प्रश्न आहे नाही? आणि अशाच लहान लहान प्रश्नांमधून त्याच्या अस्तित्वाचे गूढ हळूहळू उलगडत जाते, जसे फुलांची एक एक पाकळी उलगडत जावी आणि शेवटी केसरमंडल दिसावे, फुल तर तसे नश्वर आहे, परंतु सुगंध रुपाने ते कायम आपल्या स्मरणात राहते. इथे परमेश्वर तसा दृश्य नाही, तो निर्गुण निराकार आहे आणि म्हणूनच त्याचा अंतीम शोध लागत नाही त्यामुळेच कदाचित त्याला शोधता शोधता कविवर्य मंगेश पाडगावकर लोकांना विचारतात...

“कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी, हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी” असा विचार करीत असतांना त्यांची ईश्वरा बद्दलची आसक्ती कमी होत नाही, त्याची आळवणी करताना ते पुढे म्हणतात ...

“तिन्ही लोक आनंदाने भरुन गाऊ दे रे, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे” अशा प्रकारे प्रत्येकजण त्या निर्गुण निराकार परमेश्वराला शोधत असतो, कुणी आपल्या कृतीतून, कर्मातून प्रत्येकाची आपआपल्या धर्मानुसार, परंपरेनुसार पद्धत वेगळी मात्र ध्येय एकच.

प्रत्येकाच्या धार्मिक भावना व्यक्तिगत, वेगवेगळ्या असणार हे नक्की तरीही तीचे अंतिम स्थान, ध्येय एकच असणार जे शांतीकडे, मोक्षाकडे घेऊन जाते. आज आत्म उन्नती सोबत स्माजोन्न्तीचा विचार होणे काळाची जरज आहे, आणि हीच गोष्ट जवळपास सातशे वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांच्या लक्षात आली असावी आणि त्या साठी “आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे पसायदान हे” असे म्हणत श्री ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वाच्या कल्याणासाठी त्या परमेश्वराकडे असे सर्वश्रेष्ठ दान मागून महान कार्य केले, ज्याला कशाचीच उपमा देता येणे शक्य नाही. यातून समाजाने योग्य बोध घेणे गरजेचे आहे एकोप्याने राहून परस्परांच्या, समाजाच्या, विश्वाच्या कल्याणासाठी, हितासाठी झटायला हवे आहे. शेवटी सर्व धर्माचे तेच तर ब्रीद आहे, तरीसुद्धा हल्ली समाजात, जाती जातीमध्ये विसंवाद, असहकार दिसतो, असंतोष दिसतो जो तसा कुणाच्याही हिताचा नाही याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा, तसा सर्वांना बोध होवो हीच त्या परमेश्वराकडे नम्र प्रार्थना.

©शिवाजी सांगळे 🦋 
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

http://marathikavita.co.in/marathi-lekh/t31394/new/#new

बुधवार, २१ नोव्हेंबर, २०१८

सोहळा




५१३/१९११२०१८

शोध

शोध
नजर शोधते का नजरेला
का शोधते ज्योत तमाला?
वाजवितो कृष्ण ती पावरी
भुरळ पडे लाजऱ्या राधेला !
~शिव
५१२/१६११२०१८

थांग


५१४/२१११२०१८

खेळ



सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१८

ओघळ


५११/१९११२०१८

हायकू ३७८-३८०

#हायकू ३८०
जरठ वय
कळकाची हो मोळी
रेघोट्या भाळी १५-११-२०१८

#हायकू ३७९

#हायकू ३७८
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

किनारे


http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t28592/new/#new

शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१८

श्रीमंती

श्रीमंती

वारसा संतांचा, अभंगाचे मळे
शब्दांमृत फळे, सकल जना !

स्पष्ट होण्या भाव, भाषेचा सहारा
शब्द त्यां फुलोरा, रचनात्मक !

शब्दांतुनी येता, भावनांचा मेळा
श्रोते होती गोळा, सुजाण सारे !

गोडवे आम्हासी, माय मराठीचे
कौतुक शब्दांचे, तिन्ही त्रिकाल !

अर्पुनी शब्दधन, रसिकाचे जाती
लाभली श्रीमंती, कुबेरा पेक्षा !

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/preranadai-kavita/t31382/new/#new

सोमवार, ५ नोव्हेंबर, २०१८

हायकू ३७५-३७७

#हायकू ३७७
उडे पतंग
फिरे मांजा फिरकी
बेभरवशी ०४-११-२०१८

#हायकू ३७६

छायाचित्र सौजन्य: श्री अनिल गंद्रे

#हायकू ३७५
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

शुक्रवार, २ नोव्हेंबर, २०१८

चिंब वाटा

चिंब वाटा

छेडछाड करतो येथे, अल्लड पाऊस खोटा,
सावर सखे गं आता, ओलावल्या कुंतल बटा !

झिडकारले जरी किती, मुडपूनी नाजूक ओठां,
कळतोय सारा दवाला, लटका तुझा राग खोटा !

स्पर्शुनी तव ओष्ठकडा, करूनी तो आटापिटा,
विसावले दवथेंब वसनी, उमटवून अनेक छटा !

भिजल्या अंधार दिशा, झाकोळल्या सर्व वाटा,
द्वाड वारा हळूच उचले, छेडण्या आपुला वाटा !

नाजूक काया तशी ही, दर्शवीत रोमांच काटा,
धुक्यात चिरून जातो, तिरपा गं कटाक्ष छोटा !

पावसात या असल्या, झाल्या चिंब रान वाटा,
एकवटल्या कैक मनी, आठवणींच्याच लाटा !

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t31357/new/#new

नातं

नातं🌿

बळीचं आणि निसर्गाचं
नातं आहेच फार वेगळं,
एक भजतो जिवापाड
दूसरा लूटतो कधी सगळं !
५१०/३११०२०१८