गुरुवार, २९ डिसेंबर, २०१६

खुर्ची


हाक अंतरीची

हाक अंतरीची

       अस्तिक नास्तिकतेच्या सीमारेषा कुणी का ओढल्यात? माहित नाही? मी नाही मानत उगीच काही परंपरा. मनात नसता कुणाच्याही पाया पडणं किंवा चार लोक जातात म्हणून त्यांच्या मागे देवळात जाणं मला नाही पटत, भले मग कुणी मला नास्तिक म्हणो. माझ्या बाबतीत खुपदा असं होतं, का ते माहीत नाही. पुर्वी कामानिमित्त दौर्‍यावर जावं लागत असे, त्यामुळे बर्‍याच ठिकाणी भटकंती व्हायची, काम संपल्यावर त्या त्या वेळी व ठिकाणानुसार सोबतीचे कधी मंदिर, पार्क किंवा अन्य प्रेक्षणिय व प्रसिध्द स्थळांना भेटी द्यायचा बेत करीत, मलाही आवडायचं, एरवी सर्व ठिकाणी मी जायचा पण मंदिर वा अन्य धार्मिक ठिकाणी मी खुपदा जात नसे, याचं कारण मला आजही सांगता येत नाही परंतु बाकि लोकांच्या मते तेव्हा मी नास्तिक ठरायचो.

       एकदा सोलापूर दौर्‍यावर असतांना सोबत्यांच्या हट्टाखातर श्री सिध्देश्वर मंदिरात पोहचलाे, सुरेख नक्षीकाम केलेलं दगडी हेमाड पंथी बांधकाम, चहुबाजुला बसविलेल्या किंवा कुणी भक्तांनी आणुन ठेवलेल्या वेगवेगळ्या आकारातील अनेक शिवलिंग प्रतिमा फारच विलोभनीय, मंद दरवळणारा कर्पुर, अगरबत्ती व धुपाचा सुगंध सोबत नित्य नविन येणार्‍या भक्तांकडून होणारा घंटानाद खुप छान वातावरण होते, तरीही मी काही तरी वेगळ शोधत होतो. एका विस्तृत अशा दगडी महिरपी असलेल्या सभामंडपात कुणा बाबांचे कानडी भाषेत प्रवचन सुरू होते, आम्हा सर्वांचे दर्शन सोपस्करही उरकले होते, काही काळ बसावं म्हणुन आम्ही तेथे कठड्यावरच बसलो. माझं ध्यान त्या बाबांच्या शब्दांवर, ते मी एकाग्रतेने ऐकत होतो, काय झालं ते समजलं नाही, त्या बाबांची भाषा कळत नव्हतीच परंतु त्यांच्या शब्दांत इतकं माधुर्य होतं कि मी तीथं गोठल्यागत झालो, अर्धातास उलटला, सोबती म्हणु लागले चल निघु, पण मी हललो नाही. काय होतं ते? त्यांते शब्द माधुर्य, वातावरणाचा प्रभाव? कि अंतरीची हाक? आजपावेतो न उमगलेलं कोडं, तसाच अनुभव श्री स्वामी विवेकानंद मेमोरीयल, कन्याकुमारी येथला आरपार भारून टाकणारा.

       परमात्म्याचा अंश कधी नादातून, कधी स्वरातून तर कधी गंधातून जाणवतो, तेंव्हा आत्मा बरोबर तिथे ओढला जातो, मग ठिकाण मंदिर, दर्गा वा चर्च कोणतेही असो, स्वर उमजणारा,समजणारा जरी नसला तरीही तो मनाला भावतो व पर्यायाने आत्म्याला तेथे आेढून नेतो, कदाचित जीवा शिवाची भेट अशीच होत असावी? परम शांततेचा स्वर ॐकार असो किंवा मंदिरातल्या घंटेचा नाद, पहाटे पहाटे कानावर पडणारे अजानचे अविट स्वर नाहीतर चर्चमधे घुमणारा धीर गंभीर चर्चबेलचा आवाज असो, नकळत मनाला शांत करीत असतात, ही स्पंदणं हृदयाशी एकरूप होतात, काही वेळ तरी स्वतःला विसरायला लावतात.

       चौदाएक वर्षांपुर्वी दक्षिण भारतात दौर्‍यावर गेलो होतो, निटसं लक्षात नाही बहुतेक रामेश्वरचा बस स्टँंड असावा, वेळ पहाटे सव्वा ते साडे चारची, डिसेंबरातली बोचरी थंडी, कोपर्‍याला शेकोटी करून ड्रायव्हर, कंडक्टर असे जोडी जोडीने शेकोटीच्या भोवती बसलेले, टेप रेकाँर्डवर कुठलसं दाक्षिंणात्य सुरावटीच भजन सुरू होतं, संगीताच्या त्या सुरांची काय जादू झाली कुणास ठावूक? मी आपसुक त्या शेकोटी कडे वळलो त्यांच्या पाठीमागे शांतपणे ऐकत उभा राहीलो, माहित नाही एक विलक्षण अनुभुती जाणवत होती, भजनातील एकही शब्द समजत वा कळत नव्हता, पण सुरांनी बांधुन ठेवलं होतं मला, कसा मग्न झालो त्यात समजलंच नाही, काही वेळने बरोबरचे लोक विचारू लागले काय झालं? माझ्याकडे काहीच उत्तर नव्हते, ज्या टोळक्यात उभा होतो ते सुध्दा चक्रावलेलेे, त्यातील एकाने विचारलंच "मल्याली?" मी नकारार्थी मान हलवित म्हटलं "महाराष्ट्र".

       बहुदा असाच असावा आतला नाद, परम्यात्म्याशी नकळत कधी तरी जुळणारा, स्वतःतल्या "स्व" ची ओळख करून देणारा, म्हणुनच असावं कि सुर, स्वर, व नादाला जात धर्म नसतो, प्रांत वा देश नसतो, असतो तो केवळ जीवाशिवाचा ॠणानुबंध न दिसणारा न उमजणारा कुठेतरी निराकार ईश्वराच्या नाळेशी जोडलेला.

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t26772/new/#new

शुक्रवार, २३ डिसेंबर, २०१६

कुर्सी


कुर्सी

कुर्सी... सत्ता की
कुर्सी... अधिकार की
कुर्सी... जेष्ठता की
कर्सी... देवों की
कुर्सी... अध्यात्म की
कर्सी... भक्तों की
कुर्सी... रक्षण की
कुर्सी... आरक्षण की
अब यह न सोचो... कि
सत्ता की कुर्सी या
अन्य कुर्सी के बारे में,
कुछ कहने वाला हूँ?
जी हाँ, ओर एक कुर्सी है,
हमारे बुजुर्गों की...
सोचा है किसी ने?
बैठना चाहेंगे हम कभी
इस कुर्सी में?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/hindi-kavita/t26684/new/#new

गुरुवार, २२ डिसेंबर, २०१६

हाव सुटता सुटेना

हाव सुटता सुटेना

मी बोलावे तू गप्प व्हावे 
गोष्ट माझी कधी त्वा कळेना
अंतरीचे गुपीत माझ्या
कधीच तूजला ते उमजोना

मला वाटे नित्य नवल
गुंतलो गेलो कसे या बंधना
रोज राडे थोडे थोडे
संपवावे कसे मला कळेना

आस तुमच्या या घराची
सोडू म्हणता कशी ती सुटेना
हाव भुकेल्या या जीवाची
भागवावी म्हणता का भागेना
© शिवाजी सांगळे 

भेट तुझी माझी...

भेट तुझी माझी...

भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची
एसी युक्त हॉटेल होते गर्दीहि ती लोकांची

प्रखर उजेड नव्हता तेथे, कसलाच न पसारा
आनंदात होते सारे, आनंदची होता सारा
मला मुळी नव्हती चिंता, होणाऱ्या खर्चाची

हाती घेऊन दोन ग्लास, अदबीनं वेटर आला
वाकुनिया कमरेमध्ये, काय आणु असे म्हणाला
लागलीच ऑर्डर दिली, आण प्लेट समोस्याची

केसांमध्ये फुले होती, गालावरी तुझ्या लाली
पाहून रूप तुझे, येई स्मित माझ्या गाली
श्वासालाही ओढ होती आपल्याच स्पर्शाची

घेऊन अलगद आपण, हातामध्ये आपुलेच हात
हलकेच ठेऊन बिल, वेटरचाही गेला हात
खुप वेळ आता झाली, शपथ पुन्हा येण्याची 

© शिवाजी सांगळे 

शनिवार, १७ डिसेंबर, २०१६

भरलात मनी (लावणी)

भरलात मनी (लावणी)

मन आज का हरलं, का हो तुम्हावर जडलं?
सांगा सख्या तुम्ही, आक्रित कसं हे घडलं?

नव्हतं आजवर ध्यानी, न् माझ्या हि मनी
दिसलात जवा तुम्ही, भरलात माझ्या मनी
अवंदाच सोळाव सरलं, तवा तुम्हाला हेरलं
मन आज का हरलं....

वेगळाच तुमचा तोरा, नजरेत आग्रही होरा
बेभान करतो मला, रात दिन मग तो सारा
याड असं हे कसलं, तुम्ही मला हो लावलं?
मन आज का हरलं....

कसं सांगु तुम्हाला, होतयं काय ते मला?
एकदा याच तूम्ही, संगतीला मज जोडीला
करुया दोघं कमाल, बघतील लोक धमालं !
मन आज का हरलं....

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-shrungarik-kavita/t26588/new/#new

बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

पण काहीही म्हणा... नोट बदली


पण काहीही म्हणा...
नोट बदली

दोन हजार जरा...से
जादाच नाही का झाले?
खर्चास काढू म्हणता
सुट्टेच मिळेनासे झाले !

नोट बदलीचा हा निर्णय
एकदाचा तो घेवुन झाला,
पण काहिहि म्हणा त्यानं
देश गुलाबी नाही झाला !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t26546/new/#new

"चिमणी वाचवा निसर्ग वाचवा" (नाटिका)

नमस्कार मित्र हो,

माझ्या एका छोटूश्या मैत्रीणीच्या आग्रहाखातर लिहीलेली एक छोटीशी नाटिका "चिमणी वाचवा निसर्ग वाचवा" सादर करीत आहे, सदर नाटिकेला माननिय बाल साहित्यिक व कथाकार श्री एकनाथजी आव्हाड यांचे पुढील प्रमाणे मनोगत लाभले आहे...

"पर्यावरणाचा संदेश देणारी तसेच मुलींचा सन्मान वाढवणारी आजच्या समाजमनाला सहज भिडणारी ही बालनाटिका मुलांना सादर करायला तर आवडेलच शिवाय त्यांना खूप काही शिकवून जाईल. अभिनंदन आपले."

"चिमणी वाचवा निसर्ग वाचवा"

1. (झाड क्र. 1 – 2 – 3) झाडांच्या रुपात तीन मुली दिड ते दोन फुट अंतर ठेऊन उभ्या आहेत.
2. (मुलगी क्र. 1) हातात पाण्याचं भांड व दाणे/धन्य ते आजूबाजूला टाकते व पाण्याचं भांड ठेवते.
3. (चिमणी क्र. 1) पंख हलवीत येते व झाडा शेजारी उभी राहते.
4. (मुलगी क्र. 2) चिमणीचे घरटे हातात घेऊन येते व (मुलगी क्र. 1) च्या शेजारी उभी राहते.
5. (चिमणी क्र. 2 व 3) पंख हलवीत विरुद्ध दिशेने  त्याच वेळी तेथे येतात.
               ----- xx X xx -----
झाड-१ : काय उकडतंय नाही?

झाड-२ : हो न. सुर्य नुसता आगच ओकतोय, कधी पाऊस पडतोय असं झालय?

झाड-३ : एवढयात कसला येतोय पाऊस? आधी उन्हाळा तर जाऊ दे!

झाड-२ : मग काल एवढे ढग कशाला आले होते?

झाड-१ : हो. तुझ्या डोक्यावर सावली धरायला आले होते.

चिमणी क्र. १   पंख हलवीत झाडां मागे जाते व मान बाहेर काढून अवतीभोवती पहात झाडांशी बोलू लागते.

चिमणी क्र १ : बाई गं, खूप दमले मी, जरावेळ सावलीत बसू का? करू का थोडा आराम तुमच्या खांद्यावर बसून?                       (सर्व झाडे एकमेकाकडे पाहून हसतात)
त्याच वेळी तीची नजर दाणे टाकलेल्या ठिकाणी जाते व ती ईतर चिमण्यांना सुध्दा बोलावते. तिघी दाणे टाकलेल्या जागी गोल फिरून दाणे शोधू लागतात.
(मुलगी क्र. 2) चिमणीचे घरटे जमिनीवर ठेवते, व मोबाईल टावर सारखी उभी राहते.

चिमणी क्र १ : थांबते, हे बघा इथेच आहेत दाणे, या खायला.

चिमणी क्र ३ : (विरोध करीत) खात्री केल्या शिवाय खाऊया नको, हल्ली खरं नाही या माणसांच!

चिमणी क्र १ : मला तर बाई खूप भूक लागली आहे.

चिमणी क्र २ : तुला सांगते, या मोबाईल टावरच्या लहरीमुळे खूप त्रास होतो, डोकं गरगरतं नुसत.

चिमणी क्र १ : तू काय सांगतेस? मी तर त्या मोबाईल टावरचं घरट बांधलं होतं, हा  आता आलं लक्षात त्या टावरच्या लहरीमुळे थकायला होतं मला.

चिमणी क्र २ : हो गं, नाहीतरी या माणसांनी कौलारू घरं तोडून सगळीकडे टावर बांधले. कौलारूघरामध्ये त्या माणसां सोबत आपल्याला पण जागा मिळत होती थोडी फार.

चिमणी क्र ३ : ते झालच, ही माणसं बिल्डिंगला काचा लावतात, सूर्यप्रकाशाच्या परावर्तनाने किती उकडतं? त्यात भर म्हणुन रस्त्यावरच्या गाड्या, त्या मुळे काय कमी गरम होतं? तरी बरं ही झाडं आहेत. ( सर्व झाडे एकमेकाकडे पाहून आनंदाने हसतात)

चिमणी क्र १ : अगं. पण ते दाणे कधी खायचे आपण? बसलो आपण गप्पा मारीत, आपल्याला पण त्या बायकांचीच सवय लागली.

चिमणी क्र ३ : दाणे खायचं ठीक आहे, सापळा तर नसेल ना तीथे? आधीच आपली चिवचिव संख्या कमी झाली आहे, त्यात हे टपोरी कावले नेहमी छेड काढत असतात.

चिमणी क्र २ : तसं नाही, त्यांनी म्हणजे माणसांनी आपली रहायची सुद्धा सोय केली आहे, ते बघ घरट. (घरट्या कडे इशारा करते)

चिमणी क्र ३ : चला मग दाणे खायला... तिघी दाणे खायला जातात.

झाड क्र. १: पाहिलंत, कित्ती विश्वास आहे त्यांना आपल्यावर? नाहीतर ही माणसं, पार तोडून तोडून आपली संख्या कमी करीत सुटले आहेत.

झाड क्र. ३: हो खरं आहे, काही समजतं कि नाही त्यांना?

झाड क्र. २: हो, हों अगदी खरं आहे, बघा आजूबाजूचा सारा परिसर कसा उघडा बोडका झालायं यांच्या मूळ, स्वतः साठी पण सावलीला जागा ठेवली नाही त्यांनी.
(मुलगी क्र. 1) स्वतः कडील मोबाईल फोन काढून बोलू लागते.... हलो हलो.... काही बाही बोलत राहते, त्याच वेळी मोबाईल टावर झालेली मुलगी डोलू लागते.

चिमणी क्र ३ :  पळा, झाला टावर सुरु ...

चिमणी क्र २ : चला झाडावर बसूया, तिथे आही धोका नाही आपल्याला.

चिमणी क्र १ : खरचं, ही झाडचं आपल्या कामाला आली, माणसांना कधी कळणार कि झाडे वाचवा, पशु पक्षी वाचवा? निसर्ग वाचवा? अजुनही वेळ गेलेली नाही सावध व्हा, निसर्ग वाचवा असच ऐकत मोठे  झालो ना आपण?
हिच माणसं, मुलगी झाली तर.. माझी चिऊ म्हणत उराशी कवटाळत असतात ना तीला? मी तर आता असं म्हणेन कि...

    “चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा “
       आणि
    “मुलगी वाचवा, समाज वाचवा “

(सर्व जणी एका रेषेत उभ्या राहून प्रेक्षकांना अभिवादन करतात व पडदा पडतो)

 लेखक : शिवाजी सांगळे ©

तीचं - माझं

तीचं - माझं

तीचं माझं आजकाल
बर्‍यापैकि बिनसतं,
भेटायचं ठरवूनही
भेटीचं गणित कुठे तरी चुकतं !
मग, दोष द्यायचा
तीनं मला, मी तीला,
शोधल्यावर कळतं
कारणचं नव्हत, भेट न व्हायला !
पुन्हा होतो सुरू
खेळ अबोल्याचा,
होत नाही पुढे
बट्टी साठी हात, माझा किंवा तिचा !
किती काळ चालणार?
असा हा रूसवा?
माहीत असतं दोघांना
राग हा असतो तात्पुरताच फसवा !
पुन्हा भेट होते
थोड्याच वेळापुरती,
कधी रागाने, कधी प्रेमाने
एकटक बघतच राहते मग नुसती !
मी मात्र वेड्यागत
वाट पाहतो ती बोलायची
तीच्या मनात असतं
याचीच वेळ आहे साँरी म्हणायची !
काहीच बोलत नाही
दोघ गप्पच उभे असताे,
बोलायचं कुणी आधी
हाच विचार दोघांच्या मनी असतो !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t26538/new/#new

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०१६

पोरका (गज़ल)

पोरका (गज़ल)

अंधाराचा मी, इतका लाडका झालो,
सावलीस माझ्या, मीच पोरका झालो !

छळले कित्तेक, सुखांनी कधी म्हणुनी
दुःखांनाही मग, मी हवा हवासा झालो !

देवु किती दोष, मलाच तो मी माझा?
झेलुन आरोप, कित्तेक लोकांचे आलो !

साक्ष निरपराध्याची, एकदा काय दिली
गुन्हेगार ईथे मी,   कायदेशिरच झालो !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t26469/new/#new

फिर रात भर...


रिटायर्ड झाल्यावर

रिटायर्ड झाल्यावर

       दिड एक वर्षभरापुर्वी रिटायर्ड झालेला मित्र परवा भेटला, तसाच पुर्वी सारखा हसतमुख, खट्याळ व बोलका, काही बदल नव्हता त्याच्या वागण्या बोलण्यात, बरं वाटल त्याला पाहुन. त्याही पेक्षा एक नवी दिशा सापडली त्याच्या बोलण्यतुन.

      चार पाच जण सहज गप्पा करीत असतांना कुणी तरी त्याला विचारले, "काय करतोस रे हल्ली? कुठे पार्ट टाईम जातोस कि नाही? यावर तो जे काहि म्हणाला त्यातुन सर्वांनी बोध घ्यावा असं होतं ते...

       अरे काहीच करीत नाही, मस्त पेपर वाचतो, बायको सोबत गप्पा मारतो, वेळ प्रसंगी कामात मदत सुद्दा करतो, मित्र मंडळी व नातेवाईकांना ईतके दिवस जो वेळ देउ शकलो नव्हतो तो देतोय, देवळात जातोय, मस्त मनाला आवडतात ती गाणी ऐकतो, पहायचे राहून गेलेले जुने चित्रपट पाहतो, छान एन्जाँय करतोय सारं. त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे मुलं वाढवायची जी उणिव राहिली होती ती नातवंड वाढवताना घेतोय, तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष? सगळे जण तेच तर करतात रिटायर्ड झाल्यावर; तरीही त्यात वेगळी गंमत आहे. अरे, आपली मुलं कशी मोठी झाली आठवतं का तुम्हाला कोणाला? यावर दोघांनी नकारार्थी माना हलवल्या, बाकीचे गप्प होते.

       तो पुढे सांगु लागला अरे, आम्ही दोघं नोकरी करणारे, रोज सकाळी घाई घाईत आवरून ट्रेन पकडायला बाहेर पडायचो, त्या दरम्यान मुलांच आवरण, त्याचे कपडे, खाणं वगैरे डब्यात भरून त्यांना बेबी सिटींग मधे सोडाची घाई असायची. दिवसभराचं सर्व उरकुन घरी आल्यावर साहजिकच पहिलं लक्ष मुलां कडेच द्यावं लागायच. पुढे मुलं मोठी झाली तरीही परीस्थितीत काही विशेष फरक पडला नव्हता, त्या काळात खरोखर मुलांचे हट्ट, लाड पुरवता आले नाही, बाकि लौकीक अर्थाने त्यांच्या गरजा पुरवित होतो ईतकच, कधी कधी त्यांच्या लहान सहान गोष्टीकडे, हट्टा कडे दुर्लक्ष करावं लागलं. नोकरी पेक्षा प्रवासाने जास्त थकुन जायचो, शरीरात त्राण उरत नव्हते, त्यामुळे चिडचीड व्हायची, जे हाल माझे तेच बायकोचेही व्हायचे.

       मुलांच बालपण खऱ्या अर्थाने अनुभवलं नाही आम्ही व मुलांनी सुद्धा. खरचं आता ती खंत जाणवते, घर, संसार चालवण्याच्या चक्रात त्यांच बालपण हिरावून घेतलं व स्वतःच तारूण्य शर्यतीला जुंपलं, नाहीतर काय? दिवसेंदिवस हा जीवन संघर्ष कठीणच होत चालला आहे. अरे, आपला काळ तर कसातरी सरला, पण आजची पिढी! लांब कशाला, माझ्या मुलाच व सुनेचच उदाहरण घ्या, आपल्या पेक्षा जास्त धावपळ, दमछाक होते अश्या नोकऱ्या, त्या करता करता येणरी वेगवेगळी टेंन्शस्, कंप्युटर असुन सुद्धा कामाचा म्हणावा तसा उरक नाही हल्लीच्या पिढीकडे. खैर, काळा नुसार हे होतचं रहाणार व त्या प्रमाणे जगावे लागणार, आणि ते जगता जगता मुलांची गरज म्हणा कि आपली? सोबत रहायचं सुख तर मिळत, दोघांनाही.

       मुलांसाठी जे जे करायचं राहिलं होतं ते आज नातवंडाच करून ती कसर भरून काढतो आम्ही दोघं, नातवंडाशी खेळतो, त्यांना गोष्टी सांगतो, अभ्यास घेतो फार समाधान मिळतं त्यातुन. तरीही घर म्हटलं कि भांड्याला भांड लागायचंच, पण तेही तेवढया पुरतचं राहतं, शेवटी कुणासाठी केली होती इतक्या वर्षांची धडपड? केलेल्या धावपळीत सुख म्हणजे काय हे समजल नव्हतं ते आता समजतय, नातवंड वाढवताना, आपलचं रूप आपण घडवतोय असं वाटतं, कुणी तरी म्हटलंच आहे कि दुधा पेक्षा दुधावरची साय जास्त आपलीशी वाटते. दोस्तो, हेच खरं.
     
       मी तर माझ्या मुलांना सांगीतलयं खुप धावपळ करू नका, केवळ पैसा कमावणं हाच शेवट नाही, आपल्या मुलांना, कुटुंबाला, माणसांना वेळ द्या, त्याच्याशी बोला, संवाद साधा, मान्य कि आजची महागाई, शिक्षणाचा, औषध पाण्याचा खर्च पाहता पैसा कमी पडतो, त्याची आवश्यकता आहे, तरीही अनावश्यक स्पर्धा व त्यातुन येणारे खर्च टाळा. योग्य नियोजन करूनही चांगल व सुरक्षित जीवन जगणं आपल्याच हाती आहे. आम्हाला नाही जमलं ते नीट पणे, पण आता तुम्ही ते जमवु शकता, किंबहुना तसा प्रयत्न करू शकता तेवढा आधार आहे तुम्हांला आमचा.

       इतकं सारं तो भरभरून व कौतुकाने सांगत होता व आम्ही मुग्ध होउन ऐकत होतो, अर्धा-पाउन तास केव्हा उलटला हे सुद्धा कळल नाही. कुणी तरी म्हटलं "अरे चला कामं नाहीत का?", तेंव्हा त्याचा निरोप घेउन एक एकजण मार्गस्थ झाला, मी सुध्दा निघालो, पण मनात त्याचे शब्द पिंगा घालीत होते. खरचं आपण सुद्दा या पेक्षा वेगळ काय केलं? हा प्रश्न काही केल्या मनातुन तेवढा जात नव्हता.

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t26182/new/#new 17-11-2016

गुरुवार, ८ डिसेंबर, २०१६

पोरका

पोरका

अंधाराचा मी, इतका लाडका झालो,
सावलीस माझ्या, मीच पोरका झालो !

©शिव

संसार


रिक्तता

रिक्तता

सांज का रिती एकाकी
आठवणी सोडून आली,
सोबती कुणीच नाही
बंध सारे तोडून आली !

आज ना तरळले अश्रु
ओलावले नाहीच डोळे,
स्वप्ने थिजवुन पापणीत
अंधारात उघडेच डोळे !

मन ठाव कसा लागावा
रिक्त अंधार पोकळीला,
आलेच भरून नभ जरी
रिक्तता उरे आभाळाला !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t26438/new/#new

बुधवार, ७ डिसेंबर, २०१६

वापसी की राह से...


पाती


वळण वाट

वळण वाट

प्रवास कुणाचा कुठवर
कोणास का ठावूक आहे?
प्रवास हा पाऊल वाटेचा
जसा शहरा पर्यंत आहे !

शोधते कोणास हि वाट?
परिचित कुणी दिसते आहे?
वळणावरून जे वळून गेले
परत का ते वळणार आहे?

सुख दुःखे, अशीच वळणे,
कोण त्यां चुकविणार आहे?
नाते पाऊल वाटेचे शहराशी
वळणां सह जुळणार आहे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t26432/new/#new

रविवार, ४ डिसेंबर, २०१६

कंदिल


कंदिल

लाईट नसलेल्या गावात...
गुरं परतीच्या सांजेला
नाजुक कापर्‍या हाताने
फुई आजी राखेने
लख्ख काच पुसायची
कंदिल प्रकाशात पार
उजळून जायची पडवी
गुरांच्या स्वासांचा...,
घंटाचा नाद घुमु लागे...
तोवर कुणी घोंगडी अंथरे,
मधोमध कंदिल
आजीेच्या पुढ्यात हरीपाठ
कोंडाळ करून आम्ही मुलं,
"देवाचीये द्वारी..." पासुन
"आरती ज्ञानराजा..." पर्यंत
गोड समाधी, भारणारी
शेवट... साखर शेंगदाण्याचा
मिठाई पेक्षा, गोड प्रसाद
आता विज आली अन्
हरीपाठ... हरवला...
आजी संगे...हरवला,
कंदिल आठवणीतला!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t26384/new/#new

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

चौकट

चौकट

जन्म झाल्यावर प्रत्येक जीव धर्म, जात, पोटजात आणि कुळ यातच वाटला जातो, एक सामाजिक चौकट घेउन जगु लागतो. पुढे आई बापाच्या कुवती नुसार शाळेत माध्यम निवडलं जातं व पुढील दहा बारा वर्षा साठी पुन्हा चौकट तयार होते, त्यानंतर अनेक अभ्यासक्रमांच्या चौकटी पैकी आजुबाजुला सुरू असलेल्या शर्यतीत सामिल होण्यासाठी एक निवडली जाते, डोनेशन, कँपिटेशन फी वगैरे भरून झेपत असो नसो, तरी या चौकटीत टिकुन रहायचा केविलवाणा प्रयत्न करतात.

स्वतःला मान्य असो वा नसो, तरी जगताना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अनेक वेगवेगळ्या चौकटी भेदाव्या लागतात, अगदि शिक्षण, नोकरी, घर एवढच काय तर लग्न सुद्धा चौकट पाहूनच कराव लागतं. कधी नवरा, कधी बाप अश्या भुमिका पार पाडीत जगावं लागतं. बरं पुरूषांच्या बाबतीत जबाबदार्‍या काही प्रमाणात कमी आहेत, परंतु स्त्रियांच्या संबंधात असं होत नाही, त्यांना लहानपणा पासुन अनेक बंधनांच्या चौकटीत राहून सोशीकपणे जगावं लागतं. मला स्त्री पुरूष असा भेदभाव नाही करायचा, ना स्त्री मुक्ती वगैरे बद्दल बोलायचं, तरीही जे सत्य आहे ते नाकारता येत नाही.

चौकटीत जीव स्थिरावतो, काहीसा थांबतो, तेच वर्तुळात तो फिरत राहतो. कदाचित तेच कारण असेल म्हणुन आपले फोटो आयताकृत असतात, अपवाद म्हणुन कधी वर्तुळातही असतात, पण प्रचलित असतात ते आयतातलेच. काय किमया असावी चौकटीची? चौकट घडवते, चौकट बिघडवते चांगल्याला वाईट तर क्वचित प्रसंगी वाईटाला चांगलं बनवते.

चौकटीत जे काही असतं ते वेगळ दिसतं, या संदर्भात १९८१ साली धारवी झोपडपट्टीतील कथेवर प्रदर्शित झालेला चित्रपट "चक्र", ज्याचं स्मिता पाटिल यांच उघड्यावर अंघोळ करतानाचं पोस्टर जे रेल्वे, बस स्टाँप लगतच्या भिंतीवर लावलेलं, खुप वेळा पाहिलं होतं, माहित नाही तेव्हा त्या पोस्टरची चर्चा का झाली होती ते? खरं तर रेल्वे लगतच्या झोपडपट्टीतलं ते वास्तव होतं, सामान्यपणे रोज सकाळी अश्या अंघोळ करणार्‍या स्त्रीया, मुली अनेकांना दिसल्या असतील, पण त्या पोस्टरची चर्चा खुप झाली ती केवळ त्या पोस्टरला असलेल्या चौकटी मुळे, एका चौकटीने लोकांचा दृष्टीकोणच बदलला होता तेव्हा हे खरं.

पुर्वी आपल्याकडे अशी फँशन होती कि घरात देवादिकांचे फोटो फ्रेम भिंतीवर लावले जात व पुजाअर्चा केली जात असे कारण तशी मानसिकता बिंबवली गेली होती, तरी शेवटी प्रश्न श्रध्देचा असल्यामुळे निमुटपणे संस्काराची चौकट पाळली गेली.

जन्म ते मृत्यु असं एक चक्र पुर्ण करणारी चौकट प्रत्येकाच्या वाट्याला येते, कुणाचाही जीवनपट उलगडून पाहिला तर लक्षात येईल कि जन्मा पासुन सुरू होणारी चौकट मरणा नंतर सुध्दा चौकटीतच नेते, या दोन चौकटीतला फरक एवढाच उरतो तो म्हणजे या चौकटीला हार असतो.

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t26145/new/#new

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०१६

नामशेष

नामशेष

व्हावा कसा ध चा मा आता?
बाराखडी ती नामशेष झाली,
राईट हक्क वाटा सांगणार्‍या
जाणिवांची नवी भाषा आली !

राहिला ना आता तसा काका
ना आता तसा पुतण्या उरला,
प्रत्येकजण हल्ली सर्व गोष्टीत
आपलाही वाटा मागु लागला !

काय आणले कुणी येतांना?
सोबतीला काय नेणार आहे?
जगताना शब्द,जे दिलेे घेतले
शेवटपर्यत तेच उरणार आहे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t26313/new/#new

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

बदल

बदल

पाजळली ज्यांनी शस्त्रे होती
लाळ का आज घोटीत आहे?

पेटविल्या होत्या मशाली कधी
हात आता मुजरे झाडीत आहे!

चेतणारा जण शब्द ज्वाळांनी
कसा आज लोळा गोळा आहे?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t26264/new/#new

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०१६

पुणे न् उणे?

पुणे न् उणे?

     पुण्यातील ट्राफिक हा भारत पाकिस्तान मुद्द्या पेक्षा मोठा विषय आहे, चार दिवसांपूर्वी पुण्यात प्रवास करण्याचा योग आला, फार मजेशीर प्रसंग अनुभवायला मिळाले. इथला एम् एच १२ व १४ चा चालक त्याच्या आजु बाजुला असलेल्या अन्य कुठल्याही एम् एच वाल्यां चालकांना परग्रहावरील ऐलियन पाहिल्या सारखे आश्चर्याने का बघताे कुणास ठाऊक? कदाचित पुण्यात येउन हे लोक एवढं शिस्तीत ड्रायव्हिग कसं करू शकतात हे कारण असु शकेल!

     दुसरं, इकडचा दुचाकी स्वार नेहमी घोड्यावर स्वार असल्यागत का वागत असतो? दिसला गँप कि दामटा घोडं! अरे रस्त्यावरील लोक बिचारे हात दाखवून थांब म्हणत असतात, तरी हे मात्र लढाईला निघाल्या प्रमाणे वागतात, तसा लढायांचा आणि पुण्याचा संबध जुनाच आहे म्हणा; वेळ कोणतीही असो, सिग्नलवरचा यु टर्न असो कि डिवायडरचा गँप असो, हे नेहमी घाईत असल्या सारखे वागणार, प्रत्येकाला कुठे जायचं असतं कुणास ठावुक?

     तसं पुणं म्हणजे एक संस्कृती, एक वारसा, एक परंपरा, एक विद्यानगरी एक उद्योग नगरी, एक आय टी हब व आणखी बरचं काही, तरीही मागील काही वर्षां पासून पुण्याची लोकसंख्या जोमाने वाढली, महाराष्ट्रा व्यतिरीक्त सार्‍या देशभरातून नोकरी धंद्या निमित्त लोक इथे आले व इकडचेच झाले. पुर्वी पेंन्शनरांचे म्हणुन ओळखले जाणारे पुणे आता चारही बाजूनी बेफाम फोफावले गेले आहे. वाढत्या लोकसंख्ये नुसार चांगल्या वाईट प्रवृत्ती, त्यातही वाईट प्रवृत्ती खूप वाढल्या पर्यायाने गुन्हेगारीचा आलेख पण वाढता आहे. बाकि काहीही म्हणा आताशा पुण्याचं मराठीपण कमी जाणवलं, खैर म्हणतात ना...

पुणे तिथे काय उणे?
मुंबई प्रमाणे इथेही
लागले आहेत फुटूू
परप्रांतियांचे पान्हे !

     उगीच अन्य कुठल्या शहराशी तुलना वगैरे म्हणुन नाही केली, आलेला अनुभव शेअर करावा वाटला ईतकचं.

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t26243/new/#new

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०१६

सी सी टीव्ही व लक्ष

सी सी टीव्ही व लक्ष

     किती चमत्कारीक आहोत ना आपण? स्व:ताच स्व:तावर नजर ठेवु लागलोत, हल्ली पहाव तीथं सी सी टीव्ही लावतो, रेल्वे स्टेशन, बजार, चौक, आँफिस, राहतो त्या ईमारतीत वगैरे सार्वजनिक ठिकाणी समजु शकतो, पण काही लोक स्व:ताच्या घरात सुध्दा सी सी टीव्ही लावून घेतात, याaaadcला काय म्हणायचं? सुबत्ता कि एकदुसर्‍या बद्लचा अविश्वास?

     तंत्रज्ञानाच्या प्रगती मुळे व गरज म्हणुन खरं तर सी सी टीव्हीची संकल्पना पाश्चात्य देशात सुरू झाली व जगभर पसरली, तशी हि सोय चांगलीच आहे, एखाद्या अपराधिक घटने नंतर याचा उपयोग करून अपराधी पकडले गेलेले आहेत, व न्यायदानात पण याचा उपयोग होतच आहे. आज बर्‍याच क्षेत्रात त्याचा वापर सोयी नुसार होत व वाढत गेला. परस्पराच्या विश्वासावर अवलंबुन असणारे आता सी सी टीव्हीच्या फुटेजवर विश्वास ठेवु लागलेत.

     हल्ली एकत्र कुटुंब पध्दती तशी बाद झाल्यातच जमा आहे, आटोपशीर कुटुंब संज्ञेतुन हम तीन हाच मंत्र जपला जातोय, लोकसंख्येचा विचार करता याचा किती फायदा होतो हा संशोधनाचा विषय आहे, कारण हम तीन करून सुध्दा लोकसंख्या फुगतच चालली आहे, खैर, हम तीनच्या या काळात आई वडील दोघं कामानिमित्त बाहेर, घरी मुलं एकट, त्याला सांभाळणारी आया वा नोकर, मग हे लोक आपल्या अपत्याशी कसे वागतात यावर लक्ष ठेवण्यासाठी सी सी टीव्हीची मदत घेतली जाते आणि त्याचे आश्चर्यकारक निकाल काही बाबतीत दिसुन आले.

     माणसाच्या स्वभावाचे, वागणुकिचे विविध पैलू दिसुन आले त्यात खास करून अपराधिक बबीच जास्त समोर आल्या, लहाणग्याचे दुध पिण्या पासुन ते त्याला अमानुष मारहाण करण्यापर्यंतचे विविध फुटेज समोर आलेले आहेत. या व्यतिरीक्त घरमालकाच्या गैरहजेरीत चोर्‍या करणं, चोरून खाणं इत्यादि घटना सुध्दा समोर आल्या आहेत.

     पुर्वी बरं होतं एकत्र कुटुंबात बरीच माणसं असायची, घरातील कर्त्या पुरूषावर घरी लक्ष ठेवण्यासाठी एवढा ताण येत नसे, कारण घरातील ईतर सदस्य ते काम व्यवस्थित करीत असत, मुलं अभ्यास करतात कि नाही? शेजारी पाजारी जातात का? कुणशी बोलतात? बाहेरील परके लोक, फेरीवाले वगैरे आजुबाजुला फिरताहेत का?इत्यादि बाबींवर घरातल्यांच, शेजारपाजार्‍यांच लक्ष रहायचं, एखाद्याने काही चुक केली वा अन्य काही घटना घडलीच तर त्या वेळेस हस्तक्षेप करून समोरच्याला दटावणी देत असतं, वेळ प्रसंगी मुलांवर रागावत सुद्धा असतं आणि त्या रागावण्याचा बाउ पालक कधी करीत नसत. अश्या वातावरणामुळे अपराधांच्या घटना कमी होत्या, बलात्कारा सारख्या गोष्टी तर क्वचित ऐकु येत असतं.

     एकंदरीत समाज व्यवस्था अशी होती कि सार्‍या परिसरात चालते बोलते सी.सी. टीव्ही होते, या उप्पर आपसातलं नेटवर्क एवढं स्ट्राँग असायचं कि बातमी वार्‍या सारखी पसरायची, तेही वाँट्स अँप वगैरे नसतांना. महत्वाचं म्हणजे परस्परांबद्ल विश्वास व आपलेपणा होता आणि त्या  आपलेपणाणुळे येणारे राग, लोभ, द्वेष वगैरे संमिश्र भावना पण असायच्या, परंतु या उलट परिस्थिती आज दिसते, फ्लँट कल्चर मुळे अपवादात्मक स्थितीत शेजारी वा बिल्डिंग मधे वर खाली काय घडतय वा घडलंय याचा कुणाला पत्ता नसतो. या मुळे अपराधी माणसिकता असणारे याचा सारा विचार करून अपराध करीत असतात, थोड्याश्या पैशांसाठी वयस्कर व्यक्ती, एकटी दुकटी महिला पाहून चोर्‍या करण्या पासुन ते खुना सारखे गुन्हे करतात. विकृत मानसिकता असलेले लोक तर कुठल्याही वयाच्या स्त्रीवर बलात्कार करतात, अगदि दिड वर्षाच्या बालिके पासुन ते सत्तरीतल्या आजींचा विचार सुध्दा या नराधमांच्या मनात येत नाही, तसं तर बलात्कार वाईटच, तरीही असे अपराधी पुराव्या अभावी मोकळे राहतात आणि दिवसागणिक या प्रकारच्या घटाना वाढतच आहेत. कुणाला दोषी ठरवायचं? बदललेल्या समाज व्यवस्थेला कि योग्य संस्कारा अभावी वाढत चाललेल्या विकृत, गुन्हेगारी प्रवृत्तीला?

© शिवाजी सांगळे
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t25570/new/#new

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०१६

निखारा

निखारा

सोसलेला क्षण सहवासाचा
असेल मनात कोंडलेला !

आळवु नकोस तीच रागदारी
छेडून त्याच त्या सुराला !

ऐकू नको का ह्रदयाचं काही?
घाव अजून ताजा कोरलेला !

फुंकर मारलीच तर, पेटेल
निखारा राखेत निजलेला !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t26117/new/#new

वाट पलीकडची

वाट पलीकडची

क्षण क्षण स्मृतींचे थबकले
तूझ्या भेटी वाचून

जागी गोठले दव डोळ्यातले
ओघळण्या वाचून

कोरेच राहीले कागद ते सारे
तूझ्या शब्दां वाचून

ओसाड वाट नदि पलीकडची
एकटी चाहूली वाचून

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t26104/new/#new

रविवार, १३ नोव्हेंबर, २०१६

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०१६

माझी कविता

माझी कविता

कधी शेतात राबते
कधी आकाशी विहरते
कधी एकांतात बोलते
कधी स्वप्नवत जगते
कधी वास्तव सांगते
कधी तलवार तळपते
कधी हळूवार होते
कधी भक्तीत नाहते
कधी मायेत रमते
कधी बलिश होते
कधी विडंबण करते
खुपदा प्रेमात असते
फक्त ती माझी कविता

© शिवाजी सांगळे 🎭

म्हणुन गेला कवी...

म्हणुन गेला कवी...

चर्चा  होती लोकांत
होवो नये माझा कवी,
प्रेमात तुझ्या सखे गं
म्हणुन गेला एक कवी!

कविते साठी म्हटलं
लिहावी एकदं कविता,
पण काय करावं मी?
रूसली होती कविता!

समजावलं, मनवलं
तरी ऐके ना कविता,
सांगा तूम्हीच आता
पटली का कविता?

© शिवाजी सांगळे 🎭

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०१६

पण काहीही म्हणा... काळ्याचं पांढरं?


पण काहीही म्हणा...
काळ्याचं पांढरं?

नोटांच्या निर्णयावर आता
राज कारण तापु लागेल,
काळ्याचे पांढरे करतांना
काहींना घाम फुटु लागेल !

देशाचं भलं करायच तर
नवं नवं स्विकारावं लागेल,
घेतल्या निर्णयावर जनतेला
धीराने तोंड द्यावं लागेल !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t26071/new/#new

मरणाष्टक


मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०१६

भेट


सावल्या


उत्तर


नाती


सोमवार, ७ नोव्हेंबर, २०१६

भंगार



पण काहीही म्हणा... शाप कि वरदान?


पण काहीही म्हणा...
शाप कि वरदान?

दरवर्षी पुजे नंतर अपघात
छठ् पुजा शाप कि वरदान?
पुजेनंतर घरी परततांना मात्र
सर्वांनी आवश्य ठेवावे ध्यान !

रेल्वे रूळ ओलांडणे कधीही
तसे धोकादायकच असतात,
झालेल्या अपघातानां रेल्वेला
जबाबदार कसे काय धरतात?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t26048/new/#new

रविवार, ६ नोव्हेंबर, २०१६

प्रदुषण


प्रदुषण

धुकं न् धुराचे लोटं विषारी
प्रदुषणाच्या विळख्यात ह्या
मोकळा श्वास इथे कसा
घेईल राजधानी बिचारी ?

=शिव

याचक


याचक

खायला दिलं तर नको म्हणतात,
पैसेच द्या असा आग्रह करतात,
हे तर काही मोहरेच रस्त्यावरचे
बोलावते धनी दुसरेच असतात!
=शिव

बुधवार, २ नोव्हेंबर, २०१६

उपहार


दोष द्यावा कुणा?


दोष द्यावा कुणा?

भासात जगणे म्हणावे
कि जगण्याचा हा भास?
अाश्रित असा का कुणी
परकाच भरवितसे घास !

निरागस काही, काहि
शांत शांत अतिव आत,
नजरेत पाझरे भाव तिव्र
जेंव्हा हृदयी फुटे अकांत !

उरे ना भान जगण्याचे
मरण, ते ही सुधरेना
जन्म, का व्हावा गुन्हा?
दोष द्यावा तो कुणा ?
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t25968/new/#new

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

पण काहीही म्हणा... हातात हात


पण काहीही म्हणा...
हातात हात

राजकारणावर आता काही
नवं लिहावसं वाटत नाही,
कोणताही रंग कसा असो
कुणातच कसला दम नाही !

दाखवायचे दात प्रत्येकाचे
इथे वेगळे वेगळेच आहेत,
खातांना मात्र प्रत्येका हाती
एकमेकांचेच  हात आहेत !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25832/new/#new

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

!! आरती श्री स्वामी समर्थ !!


!! आरती श्री स्वामी समर्थ !!

श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
तुम्हा कृपेने, जीवन आमुचे होउ दे सार्थ!!धृ!!

कृपा तुमची सदैव असता, ना हो कुणी कष्टी
राहुनी अक्कलकोटी, असते आम्हावरी दृष्टी
गाउ किती, वर्णु किती, करू किती स्वार्थ
तुम्ही दिला, तुम्ही घडविला, जीवनासी अर्थ

श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
तुम्हा कृपेने, जीवन आमुचे होउ दे सार्थ !!१!!

भिऊ नकोस म्हणता, नेमे पाठीशी असता
संकट काळी, बळ देउनी, हरविल्या चिंता
वेळोवेळी प्रत्यय देउन, दिले कृपा तिर्थ
होउन आता कृष्ण, करा शिवास कृतार्थ

श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
तुम्हा कृपेने, जीवन आमुचे होउ दे सार्थ !!२!!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/!!-!!-25800/new/#new

लग्न म्हणजे ?


लग्न म्हणजे ?

लग्न म्हणजे काय असते?
दोन जीवांची गरज असते !

स्वतःची जरी नसली तरी
घरच्यांची ती निवड असते !

मिरवायचे जरी नसले स्वतः
इतरांची तशी हौस असते !

पहावं करून लग्न एकदा
लग्ना नंतर वरात असते !

वरात तर चालते जोरात
वर्‍हाडी मंडळी भरात असते !

चुकवत सारया त्या नजरा
जोडी स्वतःत गुंग असते !

सांभाळत उभयता संसार धुंदी
जीवना गोडी वाढवायची असते !

नाहीतर नवरा आपल्या घरी
अन् बायको माहेरात असते !

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/vidamban-kavita/t19117/msg56122/#msg56122

घायाळ


घायाळ

किती अजुन छळणार
केवळ तू नजरेने?
आधीच घायाळ केलास
कलेजा तू नजरेने !

© शिव 🎭

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०१६

कंठ

कंठ

सुमधुर आधीच तो, आषाढात गायलेला
रानात कंठ झर्‍याचा, अाता दाटू लागला!

=शिव

शोध... स्वतःतल्या "स्व" चा

शोध...
स्वतःतल्या "स्व" चा

पसारा गोंधळल्या मनाचा
कसा सावरावा, कसा आवरावा ?
उडणार्‍या पाखराचे पंख
जेव्हा आपलेच वाटू लागतात
मग उडू लागतं, भरारी घेऊन मन,
स्वच्छंद... मोकळ्या पोकळीत...
कधी समाधी अवस्थेत,
तर कधी बधिर स्थितीत...!
कोणती अवस्था खरी...?
भानावर येते घंटेच्या स्वराने
कि तल्लीन होते कधी...पेटीच्या सुरांनी?
अगणित कोड्यांच्या, कोषात,
जोड्यांत गुंफलेलं, फुल पाखरू
सोडू पाहतं कोषाला कधी?
तरी गुंतत राहतं, एकसुरी... अल्पजीवी...
कृष्णविवरात या, "स्व" दिसत नाही,
कधी स्वतःतला, ऐकू येत नाही...
आवाज आतला...
कळूनही गीतेचा अर्थ,
गुरफटत राहतो व्यर्थ !
ऐकून सुध्दा...
ज्ञानोबाची, तुकोबाची, एखादी ओवी...!
कणा कणांनी बनलेल्या
गोळ्याला जोजवलं जातं
अलवारपणे रूजवलं जातं
कालांतराने शरीर मोकळेे होतं...
मन पुन्हा उंचउडू पाहतं,
आभाळाला गवसणी घालायला,
हरवलेल्या "स्व" शोधायला,
अविरत चक्रात फिरायला,
चौर्‍याऐंशी कोटी, कुणी म्हणे दोन?
कोणास ठाऊक? खरं खोटं...
हाच प्रश्न फिरत ठेवतो मनाला,
अनंत काळ शोधायला...
काळ शोधायला...अनंत...अनंत

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/''-25781/new/#new

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०१६

बंदि

बंदि

दिवाळीत फटाक्यांवर, बंदि घाला,
रानात यंदा पाखरांनी, फैसला केला!

=शिव

पण काहीही म्हणा... सवलत


पण काहीही म्हणा...
सवलत

मिळतात फायदे म्हणुन
घ्यायचे कोण सोडतो आहे?
परवडणारा सुध्दा रोज
सबसिडीतुन जेवतो आहे !

फुकट ते पौष्टीक असते
हाच सार्वत्रिक समज आहे,
परवडत असुन सुध्दा, सर्व
उगा सवलत घेणे गैर आहे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25773/new/#new

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०१६

पण काहीही म्हणा... भारत देशा?


पण काहीही म्हणा...
भारत देशा?

आधी वाटला दोन देशात
पुढे विखुरला जाती धर्मात,
भोग असे का भारत देशा?
वाटला जातोय आरक्षणात?

सत्तरीच्या वयात सुद्धा, का
नसे समानतेची न्याय सत्ता?
पुरविता लाड ते विविधतेचे
बनावी कशी जगी महासत्ता?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25735/new/#new

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०१६

ये उम्र बता जरा?

ये उम्र बता जरा?

बुने थे कुछ सपने
रेशम की डोरसे
फिसल गये हाथों से
रेत की तरहा...

वक्त चलता रहा
घडीके फेरों के साथ
तरसती रही उम्र
सुनी र्आँखों की तरहा...

क्या पता था आसमांको
जमीं और उसके बीच
थमेंगी कोहरेकी चादर
दरार की तरहा...

ये उम्र बता जरा?
कब तब चलेगा यह
सिलसिला धुंप छाँव का
दिन और रात की तरहा...

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/hindi-kavita/t25723/new/#new

पण काहीही म्हणा... संबध दोष


पण काहीही म्हणा...
संबध दोष

विवाहबाह्य संबध म्हणे वाढले
फेसबुक आणि वाँट्स अँप मुळे,
ओळख नसलेल्या नात्यांमधे
कुणाशी कसे वागावे का न कळे?

माध्यमांना दोष द्यायचा, पुरती
सवयच बघा आम्हाला लागली,
चुकिच्या मार्गी स्वतः जाताना
स्वतःचीच लाज का न वाटली?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25715/new/#new

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

पण काहीही म्हणा... समाज मन


पण काहीही म्हणा...
समाज मन

बलात्कार करणारा तो, तर
मुकाट बलात्कार करून जातो,
रस्त्यां रस्त्यावर समाज मात्र
सार्वजनिक मालमत्ता पेटवून देतो !

अश्याने का बलात्कार्‍यांच्या
वृत्तीत कधी, काही बदल होतो?
बदलायचे म्हणता, समाज मन
त्यावेळी आम्ही शांत का बसतो ?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25693/new/#new

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०१६

लोकल ट्रेन - जीवनवाहिनी



लोकल ट्रेन - जीवनवाहिनी

          मुंबई व तीच्या उपनगरातील लोकांची जीवनवाहिनी, अर्थात मुंबईची लोकल ट्रेन. अगदि छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) ते खोपोली, सीएसटी ते पनवेल तसेच चर्चगेट ते डहाणु पर्यंत राहणार्‍या चाकरमान्यांची हि लाईफ लाईन.

          उद्या दसरा सर्वांना सुटी असल्या मुळे एक दिवस अगोदरच मुंबईचा लोकल प्रवासी या लाईफ लाईनचं कौतुक करतो, तीची पुजा करतो, एक प्रकारे तीच्या बद्लची कृतज्ञता व्यक्त करतो. वर्षभरात जरी कधी ती उशीरा धावली, रद् झाली तरी तेवढ्या वेळापुरता तीच्यावर रागवणारा, वेळ प्रसंगी शिव्या देणारा, तीची अडवणूक करणारा प्रवासी दसर्‍याच्या दिवशी सर्व विसरून तीला सजवतो, नारळ, हार व प्रसाद अर्पण करतो तसेच त्या वेळी ड्युटीवर असलेले मोटरमन व गार्ड यांचा शाल व श्रीफळ देउन सत्कार करतो, प्रत्येकजण आपआपल्या कंपार्टमेंट मधे सजावट करून देवीप्रतिमेला गंध, पुष्प वगैरे अर्पुण आरती करतो नंतर प्रसाद दाखवुन अल्पोपहार व भेट वस्तुंचे वाटप करतो.  

          प्रवास संपता संपता पुढच्या वर्षी येणार्‍या दसर्‍याचे मनसुबे करीत आप आपल्या कामाला निघुन जातो. इतक्या दोन विरूद्ध टोकाचे स्वभाव दर्शन घडते मुंबईच्या लोकल प्रवाश्याचे. हि कहानी आहे मुंबईच्या धावत्या लोकलची व तीच्या प्रवाश्याची ...

          आम्ही पण आज सालाबाद प्रमाणे आमच्या सकाळच्या ८.११ बदलापूर ते सीएसटी लोकलची गाडीच्या अन्य प्रवाश्यासारखी पुजा केली व सर्व सह प्रवाश्यांसोबत अल्पोपहार करून आप आपल्या कामाच्या गंतव्य ठिकाणी उतरून मार्गस्थ झालो, पुढील दसर्‍याची वाट पाहण्या साठी.

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t25689/new/#new

सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

पण काहीही म्हणा... जय हो, वाघ


पण काहीही म्हणा...
जय हो, वाघ

नामशेष होणार्‍या वन्यजीवात
आता वाघांचीही वर्णी लागली,
जय वाघाच्या गायब होण्याने
सर्वत्र त्यांची चर्चा होउ लागली!

सरकार दरबारी पाहीलचं तर
बरेच कागदी वाघ नाचवले गेले,
संवर्धनाच्या आरोळ्या देणार्‍या
अधिकार्‍यांचे मांजर कसे झाले?

© शिवाजी सांगळे 🎭http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25680/new/#new

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

पण काहीही म्हणा... रोप वे ची शक्कल


पण काहीही म्हणा...
रोप वे ची शक्कल

मेट्रो झाली नंतर मोनो झाली
एसी लोकलचीही चाचणी झाली,
गर्दी कमी करण्या साठी आता
रोप वे ची शक्कल कशी लढवली?

खरा प्रश्न गर्दीचा वेगळाच आहे
एकाच दिशेला सार्‍यांचा फ्लो आहे,
कार्यालयांचे विकेंद्रींकरण व्हावे
यावर हाच एकमेव तोडगा आहे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25653/new/#new