सोमवार, २ फेब्रुवारी, २०२६
अर्ध-संकल्प
सोमवार, २६ जानेवारी, २०२६
अति तिथे माती
बुधवार, २१ जानेवारी, २०२६
वळणांवर
मंगळवार, २० जानेवारी, २०२६
अज्ञात अस्तित्व
पटकथा
शनिवार, १७ जानेवारी, २०२६
नवीन पर्व
नवीन पर्व
काही गोष्टी आपण ठरवतो त्यानुसार होतातच असं नाही, आणि असं काही झाल्यावर होणार त्रागा, अपराधीपणाची भावना सतत बोचत राहते, अर्थात 'वेळ' त्यावर आपली जादूई फुंकर घालून ते शल्य कमी करायचा प्रयत्न करते एवढं मात्र खरं. निमित्त असं झालं की दि. १० जानेवारी'२६ रोजी बाळासाहेब ठाकरे ऑडोटोरीयम, स्वारगेट, पुणे येथे #अंतर्नाद_काव्यमंच द्वारे आयोजित तिन काव्यसंग्रहांचे प्रकाशन, त्याच दिवशी पुण्यात संध्याकाळी भाचीचा विवाह सोहळा आणि दि.११ जानेवारी'२६ रोजी कस्तुरबा गांधी सभागृह, माटुंगा, मुंबई येथे माझ्या #महालेखाकार_कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या स्नेहसंमेलनाचे नियोजित होते, आणि या तीनही कार्यक्रमांना उपस्थित रहायचे ठरवले देखील होते, पण... म्हणतात ना 'man proposes, god disposes' !
उद्या पुण्यातील कार्यक्रम कसा होईल, कोण कोण भेटतील या आणि अशा असंख्य प्रश्नांचा पिंगा रात्रभर डोक्यात होता, अपुऱ्या झोपेतून सकाळी उठलो आणि त्याच नादात बाथरूममध्ये पाय मुरगळून घेतला, आणि डोक्यासह साऱ्याच नियोजनावर पाणी पडले, दुखापतीचा उगाच आणखी काही व्याप वाढू नये म्हणून नाईलाजास्तव कार्यक्रमात जाण्याचा बेत रद्द करण्याची नोबत आली. काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्यात उद्घाटक म्हणून काय बोलायचे, "गीतकाव्य" संग्रहाची प्रस्तावना लिहिताना काय विचार केला, आपलं मनोगत कसं मांडायचं वगैरेची मानसिक तयारी पण मस्त जमून आली होती, परंतु माझ्या दुर्लक्षामुळे जसा अपघात घडला, त्या क्षणी मन खिन्न झाले, आपण एका चांगल्या आणि आवडीच्या कार्यक्रमात हजर राहू शकणार नाही याचे वाईट वाटत राहिलं.
म्हणतात ना वेळेची जादूई फुंकर ते शल्य कमी करते तसं काहीसं झाल, या करता आजच्या तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग मला तरी जाणवला, म्हणजे १० तारखेच्या कार्यक्रमातील उपस्थित सर्व कवी/कवियत्री त्या दिवशी व रात्री सुद्धा भारलेल्या अवस्थेत होते, अर्थात हे जाणवलं ते वॉट्स अँप तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दुसऱ्या दिवशी त्या सर्वांची मनोगते, अनुभव, जमतील तशी टिपलेली छायाचित्रे समूहावर येऊ लागली, आणि इकडे ते सर्व पाहून, वाचून हरखून जात होतो.
दरम्यान ११ तारखेच्या स्नेहसंमेलनाची, खास करून आमचे #गणेश_शेंडे #हिंगोराणी व #चेतन_जोबनपुत्रा यांनी चित्रित केलेली छायाचित्रे देखील त्या समुहात एकापाठोपाठ एक धडकू लागली आणि मी प्रत्यक्षात तिथे उपस्थितीत असल्याचा भास करून गेली. एकेकाळचे सर्व सहकारी निदान आता कसे दिसतात हे समजत होतं, मन भेटीच्या आशेने तयार होत पण नाईलाज म्हणतात तो हाच असावा, तरीही दुधाची तहान ताकावर म्हणून मीच माझी समजूत काढली. मित्रांनो खरोखर यंदा तुम्हा सर्वांना भेटायची संधी हुकली...आता पुढच्या जानेवारीत भेटू अशी आशा करतो.
मकर संक्रांत, एक संक्रमण, एक नवीन पर्व काळ, माझ्या बाबतीत काल तसंच झालं, प्रकाशन सोहळ्यात जरी मी प्रत्यक्षात उपस्थितीत नव्हतो तरी प्राप्त छायाचित्रे आणि त्यानंतर सहभागींनी व्यक्त केलेल्या त्यांच्या कार्यक्रमाविषयीच्या आंतरिक मनोगतातून खुप सुंदर, सकारात्मक, भावनिक गोष्टी समजल्या आणि पुन्हा अनुपस्थित राहिल्याची खंत जाणवली. तरीही आशेवर जग चालते या विचाराने थंड घेतले.
मिळालेल्या स्त्रोतांनुसार कार्यक्रम जोरदार झाल्याचं समजलं आणि समाधान वाटलं. ते या साठी की सतिश रानडेसर, सौ.मेघना, परेश, निलेश व इतर सर्व आणि वेलवेट कविशा पब्लिकेशन यांची, गेली दोनतीन महिने सुरु असलेली धावफळ दहा तारखेला एका यशस्वी समेवर थांबली, अर्थात पुन्हा नव्याने झेप घेण्यासाठी. या करता आयोजक आणि सर्व सहभागी कवी/कवियत्रींचे मनापासून अभिनंदन.
काल मकर संक्रांतीच्या संध्याकाळी नीलेश याने "गीतकाव्य" (ओळ गाण्यातली भावना मनातली) या सुबक छपाई, मांडणी आणि उत्कृष्ट बांधणी असलेल्या प्रातिनिधिक संग्रहाच्या चार प्रती सोबतच सानुकूलित (customise) असे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, बँज घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली, एवढं सर्व पाहून खरोखरच आश्चर्य वाटलं ते अशा गोष्टीचं की हे अंतर्नादचे पहिलेच आयोजन नसणार, पण ते सत्य आहे, कारण अवघ्या काही महिन्यापूर्वी अंतर्नादची स्थापना झाली आणि पहिलाच उपक्रम असा यशस्वीरीत्या पार पाडणे हे नक्कीच कौतुकास्पद आहे. पुन्हा एकदा आयोजक आणि सर्व सहभागी कवी/कवियत्रींचे मनापासून अभिनंदन करतो आणि हो, पुढील कार्यक्रमापुर्वी मी परत धडपडणार नाही याची खात्री देतो.
~शिवाजी सांगळे १५०१२०२६









