बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

चौकट

चौकट

जन्म झाल्यावर प्रत्येक जीव धर्म, जात, पोटजात आणि कुळ यातच वाटला जातो, एक सामाजिक चौकट घेउन जगु लागतो. पुढे आई बापाच्या कुवती नुसार शाळेत माध्यम निवडलं जातं व पुढील दहा बारा वर्षा साठी पुन्हा चौकट तयार होते, त्यानंतर अनेक अभ्यासक्रमांच्या चौकटी पैकी आजुबाजुला सुरू असलेल्या शर्यतीत सामिल होण्यासाठी एक निवडली जाते, डोनेशन, कँपिटेशन फी वगैरे भरून झेपत असो नसो, तरी या चौकटीत टिकुन रहायचा केविलवाणा प्रयत्न करतात.

स्वतःला मान्य असो वा नसो, तरी जगताना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अनेक वेगवेगळ्या चौकटी भेदाव्या लागतात, अगदि शिक्षण, नोकरी, घर एवढच काय तर लग्न सुद्धा चौकट पाहूनच कराव लागतं. कधी नवरा, कधी बाप अश्या भुमिका पार पाडीत जगावं लागतं. बरं पुरूषांच्या बाबतीत जबाबदार्‍या काही प्रमाणात कमी आहेत, परंतु स्त्रियांच्या संबंधात असं होत नाही, त्यांना लहानपणा पासुन अनेक बंधनांच्या चौकटीत राहून सोशीकपणे जगावं लागतं. मला स्त्री पुरूष असा भेदभाव नाही करायचा, ना स्त्री मुक्ती वगैरे बद्दल बोलायचं, तरीही जे सत्य आहे ते नाकारता येत नाही.

चौकटीत जीव स्थिरावतो, काहीसा थांबतो, तेच वर्तुळात तो फिरत राहतो. कदाचित तेच कारण असेल म्हणुन आपले फोटो आयताकृत असतात, अपवाद म्हणुन कधी वर्तुळातही असतात, पण प्रचलित असतात ते आयतातलेच. काय किमया असावी चौकटीची? चौकट घडवते, चौकट बिघडवते चांगल्याला वाईट तर क्वचित प्रसंगी वाईटाला चांगलं बनवते.

चौकटीत जे काही असतं ते वेगळ दिसतं, या संदर्भात १९८१ साली धारवी झोपडपट्टीतील कथेवर प्रदर्शित झालेला चित्रपट "चक्र", ज्याचं स्मिता पाटिल यांच उघड्यावर अंघोळ करतानाचं पोस्टर जे रेल्वे, बस स्टाँप लगतच्या भिंतीवर लावलेलं, खुप वेळा पाहिलं होतं, माहित नाही तेव्हा त्या पोस्टरची चर्चा का झाली होती ते? खरं तर रेल्वे लगतच्या झोपडपट्टीतलं ते वास्तव होतं, सामान्यपणे रोज सकाळी अश्या अंघोळ करणार्‍या स्त्रीया, मुली अनेकांना दिसल्या असतील, पण त्या पोस्टरची चर्चा खुप झाली ती केवळ त्या पोस्टरला असलेल्या चौकटी मुळे, एका चौकटीने लोकांचा दृष्टीकोणच बदलला होता तेव्हा हे खरं.

पुर्वी आपल्याकडे अशी फँशन होती कि घरात देवादिकांचे फोटो फ्रेम भिंतीवर लावले जात व पुजाअर्चा केली जात असे कारण तशी मानसिकता बिंबवली गेली होती, तरी शेवटी प्रश्न श्रध्देचा असल्यामुळे निमुटपणे संस्काराची चौकट पाळली गेली.

जन्म ते मृत्यु असं एक चक्र पुर्ण करणारी चौकट प्रत्येकाच्या वाट्याला येते, कुणाचाही जीवनपट उलगडून पाहिला तर लक्षात येईल कि जन्मा पासुन सुरू होणारी चौकट मरणा नंतर सुध्दा चौकटीतच नेते, या दोन चौकटीतला फरक एवढाच उरतो तो म्हणजे या चौकटीला हार असतो.

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t26145/new/#new

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०१६

नामशेष

नामशेष

व्हावा कसा ध चा मा आता?
बाराखडी ती नामशेष झाली,
राईट हक्क वाटा सांगणार्‍या
जाणिवांची नवी भाषा आली !

राहिला ना आता तसा काका
ना आता तसा पुतण्या उरला,
प्रत्येकजण हल्ली सर्व गोष्टीत
आपलाही वाटा मागु लागला !

काय आणले कुणी येतांना?
सोबतीला काय नेणार आहे?
जगताना शब्द,जे दिलेे घेतले
शेवटपर्यत तेच उरणार आहे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t26313/new/#new

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

बदल

बदल

पाजळली ज्यांनी शस्त्रे होती
लाळ का आज घोटीत आहे?

पेटविल्या होत्या मशाली कधी
हात आता मुजरे झाडीत आहे!

चेतणारा जण शब्द ज्वाळांनी
कसा आज लोळा गोळा आहे?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t26264/new/#new

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०१६

पुणे न् उणे?

पुणे न् उणे?

     पुण्यातील ट्राफिक हा भारत पाकिस्तान मुद्द्या पेक्षा मोठा विषय आहे, चार दिवसांपूर्वी पुण्यात प्रवास करण्याचा योग आला, फार मजेशीर प्रसंग अनुभवायला मिळाले. इथला एम् एच १२ व १४ चा चालक त्याच्या आजु बाजुला असलेल्या अन्य कुठल्याही एम् एच वाल्यां चालकांना परग्रहावरील ऐलियन पाहिल्या सारखे आश्चर्याने का बघताे कुणास ठाऊक? कदाचित पुण्यात येउन हे लोक एवढं शिस्तीत ड्रायव्हिग कसं करू शकतात हे कारण असु शकेल!

     दुसरं, इकडचा दुचाकी स्वार नेहमी घोड्यावर स्वार असल्यागत का वागत असतो? दिसला गँप कि दामटा घोडं! अरे रस्त्यावरील लोक बिचारे हात दाखवून थांब म्हणत असतात, तरी हे मात्र लढाईला निघाल्या प्रमाणे वागतात, तसा लढायांचा आणि पुण्याचा संबध जुनाच आहे म्हणा; वेळ कोणतीही असो, सिग्नलवरचा यु टर्न असो कि डिवायडरचा गँप असो, हे नेहमी घाईत असल्या सारखे वागणार, प्रत्येकाला कुठे जायचं असतं कुणास ठावुक?

     तसं पुणं म्हणजे एक संस्कृती, एक वारसा, एक परंपरा, एक विद्यानगरी एक उद्योग नगरी, एक आय टी हब व आणखी बरचं काही, तरीही मागील काही वर्षां पासून पुण्याची लोकसंख्या जोमाने वाढली, महाराष्ट्रा व्यतिरीक्त सार्‍या देशभरातून नोकरी धंद्या निमित्त लोक इथे आले व इकडचेच झाले. पुर्वी पेंन्शनरांचे म्हणुन ओळखले जाणारे पुणे आता चारही बाजूनी बेफाम फोफावले गेले आहे. वाढत्या लोकसंख्ये नुसार चांगल्या वाईट प्रवृत्ती, त्यातही वाईट प्रवृत्ती खूप वाढल्या पर्यायाने गुन्हेगारीचा आलेख पण वाढता आहे. बाकि काहीही म्हणा आताशा पुण्याचं मराठीपण कमी जाणवलं, खैर म्हणतात ना...

पुणे तिथे काय उणे?
मुंबई प्रमाणे इथेही
लागले आहेत फुटूू
परप्रांतियांचे पान्हे !

     उगीच अन्य कुठल्या शहराशी तुलना वगैरे म्हणुन नाही केली, आलेला अनुभव शेअर करावा वाटला ईतकचं.

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t26243/new/#new

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०१६

सी सी टीव्ही व लक्ष

सी सी टीव्ही व लक्ष

     किती चमत्कारीक आहोत ना आपण? स्व:ताच स्व:तावर नजर ठेवु लागलोत, हल्ली पहाव तीथं सी सी टीव्ही लावतो, रेल्वे स्टेशन, बजार, चौक, आँफिस, राहतो त्या ईमारतीत वगैरे सार्वजनिक ठिकाणी समजु शकतो, पण काही लोक स्व:ताच्या घरात सुध्दा सी सी टीव्ही लावून घेतात, याaaadcला काय म्हणायचं? सुबत्ता कि एकदुसर्‍या बद्लचा अविश्वास?

     तंत्रज्ञानाच्या प्रगती मुळे व गरज म्हणुन खरं तर सी सी टीव्हीची संकल्पना पाश्चात्य देशात सुरू झाली व जगभर पसरली, तशी हि सोय चांगलीच आहे, एखाद्या अपराधिक घटने नंतर याचा उपयोग करून अपराधी पकडले गेलेले आहेत, व न्यायदानात पण याचा उपयोग होतच आहे. आज बर्‍याच क्षेत्रात त्याचा वापर सोयी नुसार होत व वाढत गेला. परस्पराच्या विश्वासावर अवलंबुन असणारे आता सी सी टीव्हीच्या फुटेजवर विश्वास ठेवु लागलेत.

     हल्ली एकत्र कुटुंब पध्दती तशी बाद झाल्यातच जमा आहे, आटोपशीर कुटुंब संज्ञेतुन हम तीन हाच मंत्र जपला जातोय, लोकसंख्येचा विचार करता याचा किती फायदा होतो हा संशोधनाचा विषय आहे, कारण हम तीन करून सुध्दा लोकसंख्या फुगतच चालली आहे, खैर, हम तीनच्या या काळात आई वडील दोघं कामानिमित्त बाहेर, घरी मुलं एकट, त्याला सांभाळणारी आया वा नोकर, मग हे लोक आपल्या अपत्याशी कसे वागतात यावर लक्ष ठेवण्यासाठी सी सी टीव्हीची मदत घेतली जाते आणि त्याचे आश्चर्यकारक निकाल काही बाबतीत दिसुन आले.

     माणसाच्या स्वभावाचे, वागणुकिचे विविध पैलू दिसुन आले त्यात खास करून अपराधिक बबीच जास्त समोर आल्या, लहाणग्याचे दुध पिण्या पासुन ते त्याला अमानुष मारहाण करण्यापर्यंतचे विविध फुटेज समोर आलेले आहेत. या व्यतिरीक्त घरमालकाच्या गैरहजेरीत चोर्‍या करणं, चोरून खाणं इत्यादि घटना सुध्दा समोर आल्या आहेत.

     पुर्वी बरं होतं एकत्र कुटुंबात बरीच माणसं असायची, घरातील कर्त्या पुरूषावर घरी लक्ष ठेवण्यासाठी एवढा ताण येत नसे, कारण घरातील ईतर सदस्य ते काम व्यवस्थित करीत असत, मुलं अभ्यास करतात कि नाही? शेजारी पाजारी जातात का? कुणशी बोलतात? बाहेरील परके लोक, फेरीवाले वगैरे आजुबाजुला फिरताहेत का?इत्यादि बाबींवर घरातल्यांच, शेजारपाजार्‍यांच लक्ष रहायचं, एखाद्याने काही चुक केली वा अन्य काही घटना घडलीच तर त्या वेळेस हस्तक्षेप करून समोरच्याला दटावणी देत असतं, वेळ प्रसंगी मुलांवर रागावत सुद्धा असतं आणि त्या रागावण्याचा बाउ पालक कधी करीत नसत. अश्या वातावरणामुळे अपराधांच्या घटना कमी होत्या, बलात्कारा सारख्या गोष्टी तर क्वचित ऐकु येत असतं.

     एकंदरीत समाज व्यवस्था अशी होती कि सार्‍या परिसरात चालते बोलते सी.सी. टीव्ही होते, या उप्पर आपसातलं नेटवर्क एवढं स्ट्राँग असायचं कि बातमी वार्‍या सारखी पसरायची, तेही वाँट्स अँप वगैरे नसतांना. महत्वाचं म्हणजे परस्परांबद्ल विश्वास व आपलेपणा होता आणि त्या  आपलेपणाणुळे येणारे राग, लोभ, द्वेष वगैरे संमिश्र भावना पण असायच्या, परंतु या उलट परिस्थिती आज दिसते, फ्लँट कल्चर मुळे अपवादात्मक स्थितीत शेजारी वा बिल्डिंग मधे वर खाली काय घडतय वा घडलंय याचा कुणाला पत्ता नसतो. या मुळे अपराधी माणसिकता असणारे याचा सारा विचार करून अपराध करीत असतात, थोड्याश्या पैशांसाठी वयस्कर व्यक्ती, एकटी दुकटी महिला पाहून चोर्‍या करण्या पासुन ते खुना सारखे गुन्हे करतात. विकृत मानसिकता असलेले लोक तर कुठल्याही वयाच्या स्त्रीवर बलात्कार करतात, अगदि दिड वर्षाच्या बालिके पासुन ते सत्तरीतल्या आजींचा विचार सुध्दा या नराधमांच्या मनात येत नाही, तसं तर बलात्कार वाईटच, तरीही असे अपराधी पुराव्या अभावी मोकळे राहतात आणि दिवसागणिक या प्रकारच्या घटाना वाढतच आहेत. कुणाला दोषी ठरवायचं? बदललेल्या समाज व्यवस्थेला कि योग्य संस्कारा अभावी वाढत चाललेल्या विकृत, गुन्हेगारी प्रवृत्तीला?

© शिवाजी सांगळे
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t25570/new/#new