गुरुवार, २६ मार्च, २०२०

कोरोना कैदी?

कोरोना कैदी?

बाहेर कर्फ्यु सदृश वातावरण, रस्त्यावर उगाच भटकणाऱ्यांना वर्दीवाले मनापासून चोपतात अशा बातम्या आणि त्यात त्यांचा दोष नाही हे पटत होतं, आणखी म्हणजे आम्ही त्या शहरातील जावई आहोत याचा पास वा परवाना आमच्याकडे नसल्याने आणि त्यांना हे कळायची सुतराम शक्यता नसल्याने आम्ही मात्र नजरकैदेत अन् त्या नाइलाजामुळे संध्याकाळी अंगणात खुर्ची टाकून बसलो, सहज वर नजर गेली, तर निलगिरीच्या पानांआड शेजारच्या इमारतीच्या टेरेसवर काहीतरी हालचाल दिसली, पाहतो तर चारपाच जणांच एक वानर कुटुंब मस्त मजेत उड्या मारीत सैरसपाटा करीत होतं, ते पाहून मनात उगाच त्यांच्या बद्दल आसूया वाटू लागली, एकीकडे सरकारी आदेशानुसार चालती बोलती माणसं आपआपल्या घरात व आहे त्या जागेवरच पुतळा झालेली आणि एक हे मुक्त जीव, आपला नैसर्गिक हक्क बजावत जणू जाणीव करून देत होते कि, निसर्गाचा मान राखा, तो तुमची काळजी घेईल, पण माणूस असा विचार थोडा न करतो, तो तर स्वार्थासाठी जगतो.

पर्यटन स्वखर्चाने असो वा फुकट, चार सहा दिवसांपेक्षा जास्त नको वाटतं आणि पाहुणचार कुणाकडून अगदी सासुरवाडीतला का असेना, आठ दिवसांपेक्षा जास्त बरा नसतो, सद्या अशीच काहीशी अवस्था माझी झाली आहे म्हणूनच म्हणावंसं वाटतं की काय पण वेळ येते एक एकदा!

गेल्या महिन्यात सासुबाईनां देवाज्ञा झाल्यामुळे सासुरवाडीला यावं लागलं, जवळपास नाही हो, चांगलंच बाराशे किलोमीटर लांब, परमुलखात ग्वाल्हेरला काही दिवसांच्या मुक्कामा नंतर आस्मादिक सहकुटुंब पुन्हा आपल्या घरी 'माहेरी' सुखरूप परत आलेले.

पण वेळ सांगून येत नाही म्हणतात तेच खरं, आणखी काही कामानिमित्त आठवड्यापुर्वी पुन्हा सासुरवाडीला यावं लागलं आणि तेही नेमकं कोरोनाच्या सावटाखाली, आणि तिथेच सारा घोटाळा झाला. तसं पाहिलं तर काही अपवाद वगळता सासुरवाडीला येणं नुकसानदायक नाही हे समस्त जावई मंडळींना वेगळं सांगायला नको, पण परीस्थिती तुमच्यावर कशी वेळ आणेल हे सांगता येत नाही, अगदी असंच काहीसं झालं, परतीच्या हिशोबाने तिकीट वगैरे बुक करून झाले होते, पण... करोना आडवा आला, शासकीय आदेशानुसार सुरवातीला मार्च अखेर लॉकडाऊनचा आदेश, सर्व वाहतूक बंद, याला काही पर्याय नाही...इतपत ठिक म्हणून "मरता ना क्या करता"? असा विचार करीत मनाला समजावलं.

रात्री आठ वाजता प्रधान सेवकांनी देशाला केलेले संबोधन ऐकलं आणि पहिल्यांदा पुढील एकवीस दिवसांच्या कंपलसरी मुक्कामाची आम्ही धास्ती घेतली, तसा कुठल्याही प्रकारचा ताण नसला तरी, शेवटी कुणीही स्वतःला आपल्या नेहमीच्या वर्तुळातच सुरक्षित मानतो, त्याला मी पण अपवाद नाही, एकीकडे मुलांची काळजी आणि लोकांच्या दृष्टीने महत्वाची नसली तरी आपआपली वैयक्तिक (खास)गी कामं असतातच ना?

आता कोणता गनिमीकावा करावा आणि एकवीस दिवसाच्या "कोरोना कैदेतून" कशी सुटका करून घ्यावी? असा प्रश्न डोक्यात फिरतोय, परंतु काही मार्ग निघेलसा दिसत नाही. सारखं ते वानर कुटुंब नजरे समोर येतयं, आणि मान्य कराव लागतय कि "माणूस माकडांचा वंशज आहे" आणि स्वत:च्या चुकीचे आपलंच नुकसान करून घेतोय.

Marathi Lekh, March 25, 2020, 07:10:09 PM
https://marathikavita.co.in/marathi-lekh/t32387/new/#new



©शिवाजी सांगळे 🦋
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा