गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१७

नजर


किती चमत्कारिक आहोत ना आपण? स्वत:च स्वत:वर नजर ठेवू लागलोत. हल्ली पाहावं तिथं सीसीटीव्ही लावतो. रेल्वेस्टेशन, बाजार, चौक, ऑफिस, राहतो त्या इमारतीत, वगैरे सार्वजनिक ठिकाणी समजू शकतो, पण काही लोक स्वत:च्या घरातसुद्धा सीसीटीव्ही लावून घेतात. याला काय म्हणायचं? सुबत्ता की एकदुसर्‍याबद्दलचा अविश्‍वास?
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे व गरज म्हणून खरं तर सीसीटीव्हीची संकल्पना पाश्‍चात्त्य देशात सुरू झाली व जगभर पसरली. तशी ही सोय चांगलीच आहे. एखाद्या अपराधिक घटनेनंतर याचा उपयोग करून अपराधी पकडले गेलेले आहेत व न्यायदानातपण याचा उपयोग होतच आहे. आज बर्‍याच क्षेत्रात त्याचा वापर सोयीनुसार वाढत गेला. परस्परांच्या विश्‍वासावर अवलंबून असणारे आता सीसीटीव्हीच्या फुटेजवर विश्‍वास ठेवू लागलेत.
हल्ली एकत्र कुटुंब पद्धती तशी बाद झाल्यातच जमा आहे. आटोपशीर कुटुंब संज्ञेतून ‘हम दो हमारा एक’ हाच मंत्र जपला जातोय्. लोकसंख्येचा विचार करता याचा किती फायदा होतो, हा संशोधनाचा विषय आहे. कारण लोकसंख्या फुगतच चालली आहे. या काळात आईवडील दोघं कामानिमित्त बाहेर, घरी मुलं एकटी, त्याला सांभाळणारी आया वा नोकर, मग हे लोक आपल्या अपत्याशी कसे वागतात, यावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची मदत घेतली जाते आणि त्याचे आश्‍चर्यकारक निकाल काही बाबतीत दिसून आले.
माणसाच्या स्वभावाचे, वागणुकीचे विविध पैलू दिसून आले. त्यात खास करून अपराधिक बाबीच जास्त समोर आल्या. लहानग्याचे दूध पिण्यापासून ते त्याला अमानुष मारहाण करण्यापर्यंतचे विविध फुटेज समोर आलेले आहेत. याव्यतिरिक्त घरमालकाच्या गैरहजेरीत चोर्‍या करणं, चोरून खाणं इत्यादी घटनासुद्धा समोर आल्या आहेत.
पूर्वी बरं होतं. एकत्र कुटुंबात बरीच माणसं असायची. घरातील कर्त्या पुरुषावर घरी लक्ष ठेवण्यासाठी एवढा ताण येत नसे. कारण घरातील इतर सदस्य ते काम व्यवस्थित करीत असत. मुलं अभ्यास करतात की नाही? शेजारीपाजारी जातात का? कुणाशी बोलतात? बाहेरील परके लोक, फेरीवाले वगैरे आजूबाजूला फिरताहेत का? इत्यादी बाबींवर घरातल्यांचं, शेजारपाजार्‍यांचं लक्ष राहायचं. एखाद्याने काही चूक केली वा अन्य काही घटना घडलीच, तर त्या वेळेस हस्तक्षेप करून समोरच्याला दटावणी देत असत, वेळ प्रसंगी मुलांवर रागावतसुद्धा असत आणि त्या रागावण्याचा बाऊ पालक कधी करीत नसत. अशा वातावरणामुळे अपराधांच्या घटना कमी होत्या, बलात्कारासारख्या गोष्टी तर क्वचित ऐकू येत असत.
एकंदरित समाजव्यवस्था अशी होती की, सार्‍या परिसरात चालतेबोलते सीसीटीव्ही होते! याव्यतिरिक्त आपसातलं नेटवर्क एवढं स्ट्रॉंग असायचं की, बातमी वार्‍यासारखी पसरायची, तेही व्हॉट्स ऍप वगैरे नसताना! महत्त्वाचं म्हणजे परस्परांबद्दल विश्‍वास व आपलेपणा होता आणि त्या आपलेपणामुळे येणारे राग, लोभ, द्वेष वगैरे संमिश्र भावनापण असायच्या. परंतु या उलट परिस्थिती आज दिसते. फ्लॅटकल्चरमुळे अपवादात्मक स्थितीत शेजारी वा बिल्डिंगमध्ये वर किंवा खाली काय घडतंय वा घडलंय, याचा कुणाला पत्ता नसतो. यामुळे अपराधी मानसिकता असणारे याचा सारा विचार करून अपराध करीत असतात. थोड्याशा पैशांसाठी वयस्कर व्यक्ती, एकटीदुकटी महिला पाहून चोर्‍या करण्यापासून ते खून करण्यासारखे गुन्हे करतात आणि असे अपराधी पुराव्याअभावी मोकळे राहतात आणि दिवसागणिक या प्रकारच्या घटना वाढतच आहेत. कुणाला दोषी ठरवायचं? बदललेल्या समाजव्यवस्थेला की योग्य संस्काराअभावी वाढत चाललेल्या विकृत, गुन्हेगारी प्रवृत्तीला?
– शिवाजी सांगळे 
९४२२७७९९४१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा