गुरुवार, २२ जून, २०१७

नजर अन् हास्य भेट

नजर अन् हास्य भेट

डोळ्यात जेंव्हा सांज उतरते, मन उगाच हळवं होउ लागतं, कातर वेळ तीलाच म्हणतात ना?
आधीच पाणीदार असलेले डोळे वेगळेच भासु लागतात, अनेक गतस्मृतीना मौनात आठवू लागतात, शुन्यात शोधु लागतात, खरं तर सार्‍या दुःखाच्या, विरहाच्या, आत लपलेल्या नाजुक, मुक्या भावनांच्या.

अलगद उलगडू लागतो मग एक एक कप्पा अतंरातला, शोधू लागतो स्वतःची जागा. कुठे काय चुकलं याची गणितं करू लागतो, बराच उहापोह करूनही हाती काहिच लागत नाही, मग कधी उगाच वाळूवर रेघोट्या ओढीत बसतं मन. उभ्या आडव्या रेघा मारून काही काळ वाळू सरकते अन् हळूच नकळत पुन्हा जागेवर येते. आलेली लाट परत माघारी जाते तशी.

असचं असतं का आयुष्य आपलं? प्रश्न मनाला पडतो, पुन्हा तेच चक्र सुरू होत. पायाखाली केव्हा पाण्याचा थंड स्पर्श होतो ते सुध्दा कळत नाही. मग आवरतं घेतो स्वतःला, उठून आजू बाजूला पाहतो, तर काय येथे प्रत्येक जण असाच स्वतःला शोधायला आलेला.

चंद्रभागेच्या वाळवंटात आणि यात काहीच फरक उरत नाही. तीथे परस्परांचे चरण स्पर्श, गळा भेट होते, पांडुरंगाच्या शोधात, तर इथे हलकी नजर अन् हास्य भेट आपल्यातले आपण सापडलो म्हणून.

=शिवाजी सांगळे  २१.०६.२०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा