गुरुवार, ८ जून, २०१७

घड्याळाकडे पहायचं असतं!

घड्याळाकडे पहायचं असतं!

ढग दाटून आल्यावर आणि पाऊस पडून गेल्यावर, वेळेचं भानच उरत नाही. एरवी सावली सोबत पळणार्‍या आम्हाला पाया खालच्या व लांबत जाणार्‍या सावल्यां वरून वेळेचा अंदाज बरोबर घेता येतो.

अशा अंधार वेळी, मग नजर वारंवार घड्याळाकडे जाते, तेंव्हा हळूच कुुणीतरी म्हणतं "काय गडबड, सारखं घड्याळ पाहताय?" काय बोलणार अशांना? वेळेशी तुमचं सुत जमणं फार महत्वाचं असं मला वाटतं. दर वर्षाचा पहिला पाऊस सगळ्यांना हवा हवासा वाटतो, तसाच बेभरवश्याचा अंधार देखिल, नंतर काय तर सवय होउन जाते दोघांचीही.

आपण मस्त पणे चालत असतो, इतक्यात सुर्यावर चादर टाकल्या सारखे ढग पसरतात, अंधार दाटु लागतो, अन् अवचित टपटप सुरू होते, सोबत छत्री तर नसतेच, कौतुक भरल्या डोळ्यांनी पडणारा एक एक थेंब डोळ्यात साठवू लागतो, कुणाला तरी आठवु लागतो, विसरतो कि आपण भिजतोय, त्यात सुद्धा एक सुुख असतं, मागील काहि महिन्यांच्या दाहक उन्हातुन सुटतोय याचं.

एक भुक असते प्रियकर, प्रेयसीला भेटण्याची, मुक्त नाही पण एकाच छत्रीत खेटून भिजण्याची, दोस्तां सोबत गरमागरम कांदा भजी खाण्याची, टपरीवर वाफाळता चहा पिण्याची, खरचं हि वेळ असते पहिल्या पावसाची, पहिल्या अंधारलेल्या वाटांची, म्हणुन तीचं भान ठेवायचं असतं, घड्याळाकडे पहायचं असतं.

=शिवाजी सांगळे, बदलापूर, जि.ठाणे. +919422779941/+919545976589 Email:sangle.su@gmail.com
http://marathikavita.co.in/marathi-lekh/!-28778/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा