सोमवार, २६ जून, २०१७

आठवतं !

आठवतं !

ढगांच्या गडगडाटांसह पागोळ्यातून पडणार्‍या पाऊस धारांचा कमी जास्त होत जाणारा लयबद्ध आवाज कानावर येत होता, मधेच वाट चूकलेल्या विजांची पळापळ खिडकीच्या काचेतून स्पष्टपणे अधोरेखीत होत होती. मध्यरात्र तशी उलटून गेलेली, पण आज डोळा लागत नव्हता. एक तर पावसाच्या धारांचा, गडगडाटाचा आवाज का कुणास ठावुक मनाला स्थिर होवु देत नव्हता.

अशा अवस्थेत विनाकारण मन फार मागे मागे जावु लागतं, नको इतक्या कुणाच्या तरी जवळ जावु पाहतं. सदमा चित्रपटातील एका दृष्यातील छतावरून, कौलांवरून ओघळणार्‍या पाण्याशी खेळणारी अल्लड, स्वतःत आकंठ हरवलेली श्रीदेवी आठवते? आणि आठवतो तीच्यावर जीवापाड जीव लावणारा कमल हसन? आठवतं! आपल्यात पण असा कुणीतरी एक असतो, जिव्हाळा जपणारा, काळजी घेत हळूवार प्रेम करणारा, आपण सुध्दा एकटेपणात शोधु लागतो त्याला, पण नाही सापडत तो, तो तर पार हरवलेला असतो डोंगराच्या कपारीवरून दूर पर्यंत दिसणार्‍या धुक्याच्या चादरी पल्याड, जाणवुन देत असतो स्वतःचं पुसटसं अस्तित्व. आजुबाजुला झाडं पण चिंब होवुन दव कुरवाळत उभी असतात, गवत फुलं दवाच्या ओझ्यानं मात्र वाकुन गेलेली, हळूहळू धुकं विरळ होवु लागतं, आपण चौकस पणे त्याचा शोध घेत असतो, मात्र तो कुठे गायब होतो ते समजत नाही.

त्याच नशेत वास्तव उजाडतं, वातावरणात अंधार तसाच भरून असतो, आता छतावर उरलेले पाऊस थेंब स्वतःला निथळत असतात, त्यांच्या पडण्याच्या कमी होत जाणार्‍या आवाजा सोबत एकाद पहाट पक्षाचा आवाज येतो आणि रस्त्यावर आँटो वगैरे वाहनांची चलती सुरू झालेली असते. रात्रभर शिणलेल्या मनाचा प्रवास हळू हळू संपवत, आळस देवुन स्वतःला ताजं करायचा प्रयत्न सुरू होतो, आजुबाजुला, शेजारी कुणीच नसतं, तेव्हा पाऊस पार थांबलेला असतो.

=शिवाजी सांगळे, बदलापूर, जि.ठाणे. +919545976589 Email:sangle.su@gmail.com
http://marathikavita.co.in/marathi-lekh/!-28903/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा