शनिवार, १९ मे, २०१८

संध्यासुर्य...एक अस्त

संध्यासुर्य...एक अस्त

सहसा मी सकाळी घरी असताना भेट होत नाही त्याची, तो जरी नित्यनेमाने वेळेवर येत असला तरी आम्ही उठायला हवं ना? आणि चुकून उठलोच, तर ईमारतींच्या भिंती पार करूनही आमची दृष्टादृष्ट होणं तसं कठीणच. तशी कधीतरी संध्याकाळी होते खऱ्या अर्थाने नजरभेट. नजर भेटच अशा साठी कि एरवी दिवसभर जरी तो डोक्यावर रेंगाळत असला तरी त्याच्याकडे नजर उचलून पहायची कुणाची हिम्मतच होत नाही.

बऱ्याच दिवसांनी काल त्याला डोंगराच्या कड्यावरून मनसोक्त बागडताना पाहिलं, काय वर्णन करू त्याचं? निशब्द होऊन पहात होतो त्याला, कधी कड्याच्या उतारावरून घरंगळत दुडूदुडू पळत होता, कधी कपारी आड लपून प्रकाशाची तेजस्वी तिरीप देऊन दर्शन देत होता तेव्हा माझी नजर त्याच्या वरून जराही हटत नव्हती इतका जवळचा आपला वाटत होता तो. सात आठ मिनटांची आमची ती नजर भेट, मोठी ओढ लावणारी, नवी उमेद, विश्वास देणारी.

आज त्याला खुप दिवसांनी पाहताना जुने दिवस आठवले, संध्याकाळी कधीतरी समुद्र तटावरुन त्याला न्याहाळत बसणं म्हणजे समाधी सुख लाभायचं, मला आवडतं किनाऱ्यावरुन सुर्यास्त पाहण... कित्येकदा आठ दहा दिवस मुक्काम असायचा किनारा असलेल्या ठिकाणी, मग रोजची संध्याकाळ त्या सोहळ्यासाठी, त्या तेजोनिधी साठी असायची. एक सहकारी तर नेहमी म्हणायचा "काय रोज रोज सुर्यास्त पाहायचा? तोच सुर्य, तोच समुद्र आणि तेच पाणी त्यात नवीन ते काय?" मी गप्प रहायचो, शांतपणे सिगारेटचे झुरके घेत डोळे उघडे ठेवून त्या तांबूस केशरी सुवर्ण गोलाकडे पहात समाधिस्त व्हायचो, आणि सहकारी चरफडत नुसताच धुर काढत असायचा.

रोज उदय, रोज अस्त त्याचा ! निदान आपल्या नजरेला दिसणारा, हरलेल्या जीवाला नवसंजिवनी देणारा तो भानू, तपन, दिवाकर, रश्मीराज, संध्यामित्र फार मोठी शक्ती, उर्जा देऊन जात असतो? पाण्यावर प्रतिबिंब रुपाने चमकणारे त्याचे अनंत सुवर्ण अवशेष आपल्या जीवनाचे बदलणारे अशाश्वत असलेले खरे रूप दाखवत असतो, नकळत अंतर्मुख व्हायला शिकवतो, दिवसभराची सारी मानसिक मरगळ आणि थकवा दूर करण्यास मदत करतो. हळूहळू केशरी छटा सोडत जेव्हा तो लालसर होऊन नजरेआड जावू लागतो, सावळ सांज गडद होऊ सारा आसमंत आपल्या कवेत घेऊ लागते, जस जसा वाऱ्याचा आणि पाया खालच्या वाळूचा मऊ, तलम स्पर्श हलकेच शितल वाटू लागतो तेव्हा मन अधीरता, उदासीनता का का वाढत असते? हे कोडं अजुन पर्यंत तरी सुटलेलं नाही. एरवी आपण चंद्राला मनाचा कारक मानतो, परंतु अस्ताला जाणारा हा संध्यासुर्य पण मनावर परिणाम करण्यास काही कमी नाही याची खात्री पटते.

याच्या संगतीत संध्याकाळी कुणाला "सांज ढले गगन तले, हम कितने एकाकी" असल्याची जाणीव होते, तर प्रेमीकांना तो रोमँटिक वाटतो, कुणा कवी, चित्रकारास मोहवणारा, भुलवणारा भासतो, तर अर्ध्य देणाऱ्या साधूला वेगळाच, दिवसाचं दान पुर्ण करून देणारा वाटतो, पण माझ्या मते आपण ज्या मनस्थितीत त्याला पाहतो, तेव्हा तेव्हा तो तसाच वाटतो, तरीसुद्धा उद्याच्या नवपहाटेची जाणीव तो करून देणारा हा मार्तंड अस्त होता होता मनात प्रेरणणेची, आशेची नवी ज्योत प्रज्वलित करून देतो त्या सृष्टी चालक भास्कराला माझे शब्दरूपी अर्ध्य.

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t30832/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा