शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

पायऱ्या

पायऱ्या

ढासळलेलं, तुटलेलं छप्पर पाहून
मन निराश झालं होतं ...
किती आठवणी, स्वप्ने... विखरून गेली,
उतरवली गेली भिंतीवरून !

दोरी, भोवरा, खुपश्या गोट्या,
पतंगाच्या त्या रंगीत शेपट्या ,
ज्या राहून गेल्या होत्या चिटकविण्याच्या...
खजिना, खोक्यात...
फक्त एवढाच होता माझ्या जवळ...!

कोपऱ्यातील खिडकी
तोडली नव्हती अजुन, जीथे
स्ट्रीट लाईटच्या उजेडात...
रात्रीत बसायचो कधी...
पुस्तक घेऊन अभ्यास करीत !

अभ्यास करता करता...
विविध भारती ऐकायचो, तो
ट्रांजिस्टर सुद्धा हरवलाय कुठेतरी!
माणुसकी सारखा...!

बाल्कनी अर्धवटच तुटलेली
कदाचित, माझ्या भूतकाळाला शोधत,
कोणाची नजर गुंतलेली तिच्यावर?
शेजारच्या ईमारतीतुन ...!

भितींचा तो तुटलेला सारा ढिगारा
कित्येकांची स्वप्ने दडपुन गेला,
स्वप्ने, ओरडून बोलावित असतील!
त्यातुन...
पण कुणाला ऐकू येतात?

रात्रीत... भीतीदायक वाटतात,
पायऱ्या, त्या तुटलेल्या जिन्याच्या
हुंदके देत असतात...
पावलांच्या चाहुलीं साठी...!

आपल्या जाणिवा वाढु लागल्या,
नव्या नव्या तंत्रज्ञाना सोबत?
ती ओढ, तो ओलावा.
उब, आर्द्रता... नात्यातील...
विरून गेली...  कदाचित?

ऐकलंय...
टाँवर होणार आहे येथे,
हाय फाय, वाय फाय !
मग कोण कुणाशी बोलणार?
लिफ्ट येणार, तेव्हां
कोण चालणार पायऱ्यांवर?

© शिवाजी सींगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t25522/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा