बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४

देश माझा

देश माझा

विखुरला गेलाय? की
विकला गेलाय देश माझा?

नक्की काही कळत नाही
कधी नेते, पुढाऱ्यांच्या हाती,
कधी व्यापाऱ्यांच्या हाती,
न् जाती धर्माच्या वेठीला
कधीचाच बांधला गेलाय देश माझा...!

वरपासून खालपर्यंतचा भ्रष्टाचार
राज्या राज्यातले घडणारे अत्याचार, 
घोटाळे आणि गैरव्यवहार
तरीही चालतोय...कोणत्या
भाबड्या आशेवर देश माझा...?

जागतिक स्तरावर लोकसंख्येत 
मोठा असूनही महासत्ता
होणार म्हणतो आम्ही...
म्हणून का जाहिर करतोय
नवनव्या योजनांची खैरात आम्ही?

फुकट सुविधा, अन्नधान्य, अनुदान
घर बसल्या जर मिळतात पोटाला!
धीट होतो प्रत्येकजण, आपल्या कक्षेत
मग हवयं कशाला कष्ट, काम कुणाला?

पाचशेची नोट, क्वाटर, भांडी न् साड्या
पाच वर्षांकरता टिकतात आम्हाला...
मोकळे पुन्हा मतदानाच्या रांगेत जायला  
अशीच लोकशाही का काय ती? हवी
आंधळ्या प्रजेला, उजेड हवा कशाला?

https://marathikavita.co.in/index.php?topic=45291.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा