मंगळवार, १७ मे, २०१६

संध्याकाळ...!



संध्याकाळ...!


फिरत फिरत समुद्र किना-यावर गेलो, तांबुस पिवळा मावळता सुर्य मला नेहमीच भुरळ घालतो, लाटा आज जरा मोठ्याच होत्या, जमेल तेवढं पुढे गेलो, दगडांवर, भिंतीवर आपटणा-या लाटांचे तुषार छानपैकी उसळुन अंगावर येत होते, त्यांची खारट चव ओठांवर जाणवत होती. सांजवारा पण हलकेच बोचरा होउ लागलेला... पक्षांचे थवे घरट्याच्या ओढीने परतीला निघाले होते, पण असं का वाटत होतं सुर्य अस्ताला जायला आज उशीर करतोय...?
"संध्याकाळ काल जरा जास्तच रेंगाळली,
तीलाही कळलं मला तुझी आठवण आली!"
स्वाभाविक आहे, अश्या रम्य वेळी तीची आठवण येणारच, निसर्गच तो, आपल्याला स्वत:त गुंतवतो हे मात्र सत्य. अशा समुद्र किना-यावरची संध्याकाळ आणि श्यामल काळे ढग जमा होता होता दुरवरून येणारा मातीचा दरवळ येउ लागला कि आपसुक आठवणी जीवंत होऊ लागतात. पावसा सोबत आमचं खुप प्रेमळ नातं आहे, किंबहुना प्रत्येकाच तसं असतंच... मग तो आला तर एकटा कसा येईल? तिला सुद्धा आठवण करून देईल...!
"नक्की ढगांनी केली असेल सरींची पाठवण?
आली असेल का तिलापण माझी आठवण?"
पाऊस पडायला लागला कि सारं कस मस्त, प्लेझंट, वेगळंच हवं हवंस वाटायला लागतं. पावसानं याववं, धुवांधार बरसावं आणि हो, अशा वेळी नेमकी आपल्याकडेच छत्री असावी व तिनं स्वतःची विसरून यावी! किंवा याच्या उलट झालं तरी चालेल, मग सर्वांच्या देखत, स्वतःच्या नकळत तीला सावरत, भिजत घेउन जायचं, पुन्हा दुस-या दिवसासाठी त्याच ओढीनं एकमेकांकडे पहायचं...
"सरींच कायं! त्या येतात धरणीच्या ओढीने
खुपदा झालो आम्ही सुध्दा चिंब जोडीने!"
केव्हा तरी परीस्थिती गडबड करते, तीचं किंवा त्याच नसणं, जास्त बोचरं भासतं, एकटेपणाचं वाटतं, मग मन कशातच रमत नाही, नेमकी ही अवस्था पाहून हळूच कुणीतरी आवाज देतं " , देखो मजनू जा रहा है..." किंवा "हिची तर पार लैला झाली गं" मग उगीच छातीत धडधडायला लागतं, पण चेह-यावर ते न दाखवता चटकन तिथुन सटकायचं. शरीराने पळतो खरं, पण मनाचं काय? ते तर केंव्हाच ट्रांन्स मधे गेलेलं, आठवणींच्या सरीत चिंब भिजत राहीलेलं... दोन्हीकडे तीच परीस्थिती, कुणी कुणाला समजवायचं? पण ते शक्य नसतं उरतं फक्त परस्परांसाठी झुरणं... कधी थेंब थेब अश्रुंचं झरणं...
"कधी चिंब पावसात आठवणींच्या भिजायचं 
सवय लागते मग एकमेकां साठी झुरायचं!"
पाऊस मग दरवर्षी येतच राहतो, ॠतुचक्रा सोबत जीवन चक्र पण चालत रहातं, आता आणखी एक छोटी छत्री सोबत आलेली असते, पावसाची परीभाषा थोडीशी बदलते, बोबडी होऊ लागते... पाऊस येतच राहतो...
मग येते अशीच एक संध्याकाळ, आयुष्याची. दोहोंपैकी कुणीतरी एकजण  पहीला नंबर लावतो, मोकळा होतो... पुन्हा नवा भुतकाळ दुस-याला गोठवतो. आराम खुर्चीत बसुन आठवणींचे झोके घेत रहातो, डोळ्यांच्या कडा ओल्या होउन सुकून जात असतात... आपोआप डुलकी लागते, शरीराच्या थकव्याने व मनाच्या एकटेपणाने. इतक्यात नात किंवा नातू खुर्ची हलवतात, मग सारी मरगळ दूर होते व त्या बाल रूपा सोबत परत एक संध्याकाळ स्मरू लागते... मनात रेंगाळत राहते.

= शिवाजी सांगळे,बदलापूर, +९१ ९४२२७७९९४१ & +९१ ९५४५९७६५८९ sangle.su@gmail.com
Marathi Lekh, November 01, 2015,01:25:08 PM http://marathikavita.co.in/marathi-lekh/!-21284/new/#new

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा