शुक्रवार, १३ जानेवारी, २०१७

मकर संक्रांत सण स्नेहाचा'


http://tarunbharat.net/archives/13507
'मकर संक्रांत सण स्नेहाचा'

आपला भारत देश सण उत्सवांचा देश आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या देशात अनेक जाती परंपरा नुसार विविध सण साजरे करण्याची परंपरा इथे आहे. येथे प्रत्येक सणाशी संबंधित चांगल्या प्रथा परंपरा आहेत व  या प्रथा परंपरा खूप विशेष मानल्या जातात, बऱ्याच प्रथां परंपरा मागे धार्मिक तर काही परंपरा मागे वैज्ञानिक कारणे आहेत. हिंदू पंचांगातील तिथी प्रमाणे आपल्या कडे साजरे होणारे सर्व सण, व्रत वैकल्ये हे नक्कीच हवामान, आरोग्य व आयुर्वेदाचा सखोल विचार करून धर्मशास्त्रकारांनी त्या त्या काळात प्रयोगात आणले आहेत. अनेक सणां पैकि ‘मकर संक्राती’ हा देशात साजरा केला जाणारा राष्ट्रीय सण म्हणायला हवा.

हिंदू श्रद्धेनुसार सूर्य प्रत्यक्ष ब्रह्मतत्त्वाचे रूप आहे, जे एक, अद्वैत, स्वयं प्रकाशमान, दैवत्वाचे प्रतिक आहे. वर्षभरात सूर्याची मेष, वृषभ, मिथुन इत्यादी बारा राशीत संक्रमणे क्रमाक्रमाने होत असतात. यांतील सर्वात प्राचीन काळापासून ओळखली गेलेली संक्रमणे म्हणजे कर्क आणि मकर; असे का? त्याचे कारण ते दिवस वर्षातले वैशिष्ट्यपूर्ण दिवस आहेत. कर्क संक्रमणाच्या दिवशी आपल्याकडे (उत्तर गोलार्धात) सर्वात मोठा दिवस आणि लहान रात्र असते; तर मकर संक्रमणाच्या दिवशी सर्वात लहान दिवस आणि मोठी रात्र असते. त्याबरोबरच, सूर्याचे उत्तरेकडे मार्गक्रमण मकर संक्रमणापासून सुरू होते. कारण त्या दिवसापासून सूर्य उत्तरेकडे झुकू लागतो. म्हणजेच सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करता होतो, यालाच उत्तरायणारंभ म्हणतात आणि त्या दिवसापासून दिवसाची लांबी वाढू लागते व उन्हाळ्याची सुरूवात होते  व सुर्याच्या उगविण्याची जागा दिवसें दिवस उत्तरेकडे सरकते हे लक्ष पुर्वक पाहिल्यास आपल्याला समजु शकते.

संपुर्ण देशात मकर संक्रांतीला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते, जसे पंजाब, हरियाना येथे लोहडी, लोहळी म्हणतात, उत्तर भारतात या सणाला ‘खिचडी संक्रांत’, उत्तर पुर्व प्रांतात बंगाल, आसामध्ये ‘भोगाली बिहू’ म्हणत तो दिवस त्यांच्या वर्षारंभाचा देखील असतो, दक्षिण भारतात ‘पोंगल’, गुजरात मध्ये ‘उत्तरायण किंवा पतागांचा’ सण म्हणतात. या काळात देशभर अनेक यात्रांची सुरवात होते, यात प्रमुख म्हणजे प्रत्येक बारा वर्षांनी हरिद्वार, प्रयाग, उज्जैन व नासिक अशा चार जागी चक्राकार पद्धतीने आयोजित होणारा कुंभमेळा होय. कोलकाता शहरा जवळ जेथे गंगा नदीचा बंगालच्या उपसागराशी संगम होतो तेथे गंगासागर यात्रा आयोजित केली जाते, तसेच दक्षिणेत शबरीमला, केरळ येथे मकरज्योतीचे दर्शन घेण्या साठी सुध्दा असंख्य भाविकांची गर्दी होते. महाराष्ट्रात कोकणात मकर संक्रांतीलाच मार्लेश्वराची यात्रा भरते व  त्या दिवशी शंकर-पार्वतीचा शुभविवाह केला जातो.

महाराष्ट्रात संक्रांतीचा सण तीन दिवस १३ ते १५ जानेवारी पर्यंत अनुक्रमे गी, संक्रांती व किंक्रांती म्हणुन साजरा करतात. तिळाचे महत्त्व असण्याचे कारण म्हणजे मकर संक्रांत हिवाळ्याच्या मध्यावर साजरी होते व तीळ उष्ण प्रकृतीचे आहेत अन् तिळाच्या वापराने थंड आणि उष्ण यांचा समतोल राखण्यास मदत होउन आरोग्यास हितावह ठरतात.

१. तीळ पाण्यात घालून त्या स्नान करणे, २. तीळ भक्षण करणे, ३. तीळचे दान करणे.

वरील प्रमाणे तिळाचा उपयोग हे संक्रांतीचे खास वैशिष्टय मानावे लागेल, संक्रांतीला तिळाचे व गुळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खायचे तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोताणे, वावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थाचा वापर जेवणात करायचा. तीळ वापरण्याचा दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतु तेव्हा या दिवशी या तिळ गुळाची देवाणघेवाण करून स्नेह वाढवायचा.

महाराष्ट्रात भोगीच्या दिवशी तिळ लावलेल्या बाजरीच्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, मूगाची डाळ, तांदूळ घालून केलेली खिचडी असा स्वयंपाक केला जातो. संक्रांतीला गुळाची, तसेच तिळाची पोळी करतात. मकर संक्रांतीपासून रथसमाप्तीपर्यंत एकमेकांना तिळगूळ देऊन 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्या साठी शुभेच्‍छा देतात. सुगडात (सुघटात) हळद-कुंकू, ऊसाचे करवे, हरभऱ्याचे घाटे, तीळ-गुळ घालून घरच्या देवांसह पाच ‘वायने’ अर्थात वाण द्यायची रूढी आहे. विवाहानंतर पहिली पाच वर्षे अनुक्रमे हळद-कुंकू, तीळ-गुळ, कंगवा, बांगड्या लुटण्याचीही म्हणजेच वाटण्याची पद्धत खूप ठिकाणी आहे. महिला हळदीकुंकू करून उपयोगी वस्तूचे वाण लुटतात. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचा दोन्हीही घरी हौसेने सणही करतात. सुनेला हलव्याचे दागिने, काळी साडी घेतात व जावयांना हलव्यांचा हार, गुच्छ देतात. लहान मुलांचे बोरन्हाणही केले जाते.

आपल्या सर्वांना माझ्या कडून मकर संक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला'.

=शिवाजी सांगळे, बदलापूर,
९५४५९७६५८९ – ९४२२७७९९४१ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा