शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

असेही स्वातंत्र्य (ट्राफिक ज्याम)

 असेही स्वातंत्र्य (ट्राफिक ज्याम)








            काही कारणास्तव कधी सार्वजनिक सुटीच्या दिवशी देखील प्रवास करावा लागतो, मान्य प्रत्येकाला काही तरी काम असावे, पण रस्त्यावर आपण आपली गाडी घेऊन आल्यावर काही नियम, शिस्त पाळावी लागते. एकेरी वाहतूक सुरू असताना आपण सुद्धा निमूटपणे एक रांगेत राहून समोरील व अन्य वाहनांना अडचण होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी, पण आमच्या कडून तेच होत नाही.

            पटकन पुढे जायच्या हेतूने प्रत्येक आगावू वाहन धारक घाई करतो, त्यातच कहर म्हणजे अँडव्हेंचर स्पोर्ट बायकर्स, जाडजूड टायरच्या बाईक घेऊन, भयानक आवाज करीत फिरायला निघतात, मधे मधे अन्य दुचाकीस्वार भलीमोठी कसरत करीत, गँप शोधून पुढे पुढे जायचा प्रयत्न करतात, प्रसंगी धडपडतात, वाहन छोटे, मोठे कोणतेही असो, घाट रस्त्यावर मात्र भल्याभल्यांची भंबेरी उडते, कधी गाडी गरम होऊन पुढे जात नाही, चढणीला मागे सरकण्याची भिती वगैरे सतत मनात राहते. बाईक स्लीप होणे तर नित्याचे.

            अरे, निघा ना फिरायला, आपली कामं करायला पण रस्त्यावर थोडा तरी civic sense वापरा. मलाच पुढे, अगोदर जायचे म्हणून दूसरी, तिसरी रांग करून संपूर्ण रस्ता आडवायचा, समोरच्या वाहनाला न सरकायला, न यायला जायला वाट, परंतु रहदारीची मात्र पुरती वाट लागते. त्यासोबत अप्रत्यक्षपणे वेळ, पैसा आणि इंधनाची हानी होत राहते, वर होणारा मनस्ताप वेगळाच.

            आपण नेहमी, प्रशासन, पोलीस यंत्रणांना दोषी ठरवतो, पण स्वतः काय करतो ते परस्पर विसरून जातो. मला वाटतं आपण ५०% जरी शिस्त, संयम पाळला तर बराच मोठा फायदा, सुविधा सर्वांना मिळू शकते.

पहा एकदा विचार करून...


~शिवाजी सांगळे

बुधवार, १३ ऑगस्ट, २०२५

वादग्रस्त प्रश्न

वादग्रस्त प्रश्न

राज्यात कबुतरां वरून वाद
राजधानीत कुत्र्यांवरून वाद!
प्रत्येकासच मानले जरी खरे
तरीही कसा मिटणार हा वाद?

नक्की काहीतरी डाव असावा
कुणीतरी वेगळी खेळी खळते
दडवायला का चुका झालेल्या
मुद्दाम का नवे विषय उचकवते?

सुशिक्षित अन् संयमी परंपरेत 
सुड, स्वार्थाचे राजकारण का!
भविष्य असल्या, या कृत्यांना 
खरोखर विसरून जाईल का?

https://marathikavita.co.in/index.php?topic=62511.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५

शाश्वत

शाश्वत

शोध घेता शाश्वताचा दु:खच गवसले मला
सुख हवे पुन्हा,भोगणारे म्हणू लागले मला

तक्रार गोठल्या बर्फास, टोचणाऱ्या सुईची
स्पर्शाने मात्र, गारठ्याचे काटे टोचले मला

कशाला हवी आणखी परीक्षा नवी विषारी
परंपरांनी जुन्या,पुन्हा खिंडीत गाठले मला

सावकाश जा तू इथून, आधीच म्हटले होते
कर्तव्यदक्ष टोळीने,होते चौकात घेरले मला

ठरविले होते टाळूया दु:खांना वारंवार जरी
सुख आगळे, भेटीत त्यांच्याच लाभले मला

नको असतो कुणासही साधा मित्र अताशा  
उगाच का सोबत्यांनी अर्ध्यात सोडले मला

https://marathikavita.co.in/index.php?topic=62363.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

शुक्रवार, ८ ऑगस्ट, २०२५

हसायला येतं ०८०८२०२५ yq १३:४१:१३

हसायला येतं

कसं काय विसरायला होतं हल्ली फार
बातमी अर्धी कुणी का देतं हल्ली फार

काय बरं होतं लिहायचं?आठवत नाय
असं विचित्र काहीतरी होतं हल्ली फार 

लक्षात ठेवतो नक्की सांगा आता जरा 
अचानक असं का बिघडतं हल्ली फार

लक्षात ठेवायचं म्हणून विसरतो सगळं
गम्मत वाटता हसायला येतं हल्ली फार 

छे, भलतंसलतं तसं तर काहीच नसावं 
वाढाया लागल वय! वाटतं हल्ली फार

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, २ ऑगस्ट, २०२५

साक्ष

साक्ष

बस एवढीच काय ती माझी कमाई आखरी
दिले घेतले जे काही त्यास साक्ष हि स्वाक्षरी 

विखुरलेत ठसे अस्पष्ट काही आसमंती येथे
तरी आहेत ठोस काही कोरलेले मना अंतरी 

सोडून कितीक द्यावे, बोलणे कुणा कुणाचे
लागतोच ना शब्द एखादा शेलका जिव्हारी 

जातो जिथे तीथे, वाटते असतो मी, एकटा
एखादी तरी असतेच, अज्ञात चिंता शेजारी 

सावल्या आठवणींच्या येता दारी मनाच्या
गुंतवून स्वतःत त्या, करतात वसूल उधारी 

https://marathikavita.co.in/index.php?topic=61550.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

गुरुवार, ३१ जुलै, २०२५

स्वातंत्र्य बंधनातले

स्वातंत्र्य बंधनातले

जीव गुदमरत आहे रे, अधांतरी 
व्याप खासा, येण्या जमिनीवरी 

कोणते आकाश येथे, जगण्याचे 
तरीही झुलतोच आहे वाऱ्यावरी 

सारेच व्यर्थ, अवडंबर शाश्वताचे 
कोण नाही, अवलंबून कुणावरी

वाटे मोहक, स्वातंत्र्य बंधनातले 
गुदमरतो श्वास बेतता जीवावरी

खेळ अवघा, विचारांचा एकल्या 
तुटते नाळ,कळते येता भानावरी

https://marathikavita.co.in/index.php?topic=61385.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, २७ जुलै, २०२५

बा विठ्ठला

बा विठ्ठला

देवा तुझ्या गाभाऱ्यात हल्ली
पावसाचा होतो थेट अभिषेक,

तुच घ्यावास ठरवून बा आता
कोण खादाड येथे, कोण नेक..!

होता जलाभिषेक डोक्यावरती 
कुंठते भक्ती, भोळ्या भक्तांची,

रिकामी होते तिजोरी बघ कशी 
दुरूस्ती होताना, तुज मंदिराची..!

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, २५ जुलै, २०२५

भुलावा












भुलावा

"चंचल हे मन माझे" न्
भुलावा हा भवसागर रे
जाईल कुठे प्रवास हा
वेळीच आता तु सावर रे

स्वार्थी मन, दुष्ट कधी
स्व:ता पुढे, का जाईना रे
इथवर येणे,बहू जाहले
योग्य सन्मार्ग तु दाखव रे

मग्न जे अंतरजाली 
वास्तव त्यांसी दावशिल रे
क्षणभंगुर मोह माया
तीतून आता तुच सोडव रे

https://marathikavita.co.in/index.php?topic=60899.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

श्रावण आला

श्रावण आला


श्रावण आला श्रावण आला 
पालवी फुलांचा बहर आला
रांगोळी फुले दारी सजताना
व्रतवैकल्यांचा आनंद आला

श्रावण आला श्रावण आला
माहेरवाशिणींचा सण आला
झिम्मा, फुगडी भोंडल्यासंगे
मंगळागौरीचाही खेळ आला

श्रावण आला श्रावण आला
मंदिरी भजनात जोश आला
आसमंती नवरंग हे उधळता
सुख, आनंदाला बहर आला

https://marathikavita.co.in/index.php?topic=60898.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, २२ जुलै, २०२५

कल्पनेच्या तीरावर

कल्पनेच्या तीरावर

कित्येक स्मृतींचा ठेवा, कल्पनेच्या तीरावर 
तेव्हा मात्र मन नादान भिरभिरते वाऱ्यावर 

गोडी म्हणा, खोडी म्हणा, लागतोच चाळा 
इवला जीव हा मग राहतोय कुठे थाऱ्यावर 

डुबकी दर डुबकी आठवत राहते काहीतरी 
पुन्हा विसरते भान न् ताबा कसला मनावर

सगळे खोडकर पाणी ढग मन आणि वारा
आरोप प्रत्यारोप, कुणी, करायचा कुणावर 

विसरतो स्वतःला, डोकावता हळूहळू येथे
विरघळताना प्रतिबिंब हे पारदर्शी जळावर 

https://marathikavita.co.in/index.php?topic=60665.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९